साईमत, नवापूर । प्रतिनिधी
येथील नगरपालिकेने शहरातील रंगेश्वर पार्क, लाखाणी पार्क, आदर्श नगरला वाळीत टाकले आहे का..? असा प्रश्न रहिवाश्यांमधून उपस्थित होऊ लागला आहे. या भागात नागरी समस्यांबाबत त्यांनी अनेकावेळा निवेदन देऊनही त्यांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. साहेब, आता अती झालं हो…आता रस्ता तयार न झाल्यास नगरपालिकेसमोरच उपोषणाला बसू, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे. रंगेश्वर पार्क ते लाखाणी पार्क रस्ता दुरुस्ती व पक्का रस्ता होण्याबाबतची मागणी तथा निवेदन रंगेश्वर पार्क व लाखाणी पार्क भागातील राहणाऱ्या नागरिकांनी तहसीलदार महेश पवार, मुख्याधिकारी स्वप्निल मुधलवाडकर यांना दिले आहे.
निवेदनामध्ये म्हटले आहे की, लाखाणी पार्क ते रंगेश्वर पार्क पुढे आदर्श नगर रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. त्यामुळे पायी व २ व्हीलर चालविणाऱ्यांचे खुपच हाल होत आहेत. खास करून स्त्रियांची व अबाल वृद्धांची चिखलामुळे खुपच गैरसोय होत आहे. अनेकवेळा टू व्हिलर चालविणारे घसरून पडत आहेत. पार्कमधील रहिवासी महाले यांची चिखलात गाडी स्लिप झाल्याने त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले होते. काही दिवसांपूर्वी शाळेत जाणारे मुले खाली पडून दुखापत झाली होती. म्हणून हा रस्ता पक्का करून मिळावा. हा रस्ता महत्त्वाचा असून त्यावर लवकर कारवाई पूर्ण करावी, अन्यथा पार्कमधील रहिवासी रास्ता रोको जन आंदोलन करुन किंवा अबालवृध्दांसह सर्व नागरिकांना उपोषणाशिवाय पर्याय उरणार नाही. कारण मागील अनेक वर्षापासून रंगेश्वर पार्क ते लाखाणी पार्क रस्ता दुरुस्ती व पक्का रस्ता करावा, अशी मागणी आहे. याबाबत गेल्यावर्षीही निवेदन दिले असल्याचे निवेदनामध्ये म्हटले आहे.
निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षऱ्या
निवेदनावर लाखानी पार्क, रंगेश्वर पार्क भागातील रहिवासी परवेज लाखाणी, अनिल वळवी, सुखेंद्र वळवी, तौसिफ सत्तारवाला, सोनु गावित, रविदास गावित, तौसिफ शेख, मेघा वसावे, सुरेखा शेख, जुबेर अन्सारी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.