नंदुरबार जिल्ह्यामध्ये मागील ३६ वर्षांपासून नर्मदा बचाव आंदोलनाच्या माध्यमातून आदिवासी भागांमध्ये काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) तक्रार दाखल केल्याच्या बातम्या समोर येत होत्या. मात्र या वृत्ताला आता मेधा पाटकर यांनी दुजोरा दिलाय.गाजियाबाद भाजपाचे जिल्हा सचिव संजीव झा यांच्या तक्रारीवरून ईडीने मेधा पाटकर या मुख्य विश्वस्त असलेल्या नर्मदा नवनिर्माण अभियान या सेवाभावी संस्थेविरोधात एफआयआर दाखल केलीय. २००५ साली आंदोलनासाठीच्या पैशांमधून मनी लॉण्ड्रींगच्या माध्यमातून राजकीय षडयंत्र रचल्याचा आरोप भाजपाच्या नेत्याने केला होता. ईडीने राजकीय नेत्यांपाठोपाठ आता नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्पात बुडित क्षेत्रातील तमाम आदिवासींना न्याय हक्क मिळवून देणाऱ्या एनजीओवर कारवाई केल्याने कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली असून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र या सर्व प्रकरणासंदर्भात मेधा पाटकर यांनी पहिल्यांदाच भूमिका मांडताना, “आमच्यावर झालेली कारवाई ही चुकीची असून हे आमच्या सारख्या जन आंदोलनाला व संघर्ष निर्माण कार्याला बदनाम करण्याचे कट कारस्थान आहे,” असं म्हटलंय.
“नर्मदा नवनिर्माण अभियानाअंतर्गत मागील अनेक वर्षांपासून तिन्ही राज्यांमध्ये नर्मदेच्या खोऱ्यात काम करत आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांवर आणि लोकांच्या समस्यांवर काम करणाऱ्या या अभियानाबद्दल एक खळबळजनक बातमी मागील तीन चार दिवसांपासून पसरवण्यात गेली आहे,” असं म्हणत आपली बाजू मांडणाऱ्या मेधा पाटकर यांच्या स्पष्टीकरणाचा व्हिडीओ समोर आलाय. “आमच्यावर जो आरोप लावण्यात आलाय तो धादांत खोटा असल्याचं आमचं स्पष्ट मत आहे. त्यांनी असं दाखवलंय की २० लोकांकडून एकच राशी आम्हाला एकाच दिवशी मिळाली. पण हे काही आमच्या कागदपत्रांवरुन सिद्ध होत नाहीय. आम्हाला हे मान्य नाही. ही राशी कुठे मिळाल्याचंही आम्हाला आढळलेलं नाही,” असं मेधा पाटकर यांनी पुढे बोलातना स्पष्ट केलंय.
