पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत चार ठिकाणी भाजपने आपले वर्चस्व प्रथापित केले. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळविला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसबद्दल (Congress) मोठे वक्तव्य केले आहे.
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने (AAP) काँग्रेसला जोरदार धक्का दिला. यानंतर येत्या काळात काँग्रेसची जागा आप घेईल, असे गडकरी म्हणाले. राजकीय घडामोडी पाहता काँग्रेस पक्ष कमी होत असताना त्याची जागा प्रादेशिक पक्ष घेत आहे.
मात्र हे लोकशाहीसाठी घातक असल्याचे गडकरी म्हणाले. एका मुलाखतीत त्यांना विरोधक आणि लोकशाही यावर प्रश्न विचारण्यात आला. यावेळी बोलताना नितीन गडकरींनी काँग्रेसबद्दल भूमिका मांडली. काँग्रेस पक्षाला मजबूत होण्याची गरज आहे. लोकशाही ही सत्ताधारी पक्ष आणि विरोधक अशा दोन चाकांवर चालते. सक्षम विरोधक ही लोकशाहीची गरज आहे. प्रत्येकाला संधी मिळत असते. विजय -पराजय तर होतच राहील. त्यामुळे निराश होऊन पक्ष आणि विचारधारेला न सोडता काम करत राहिलं पाहिजे , असा सल्ला गडकरी यांनी दिला.



