धरणगाव ः प्रतिनिधी
एकीकडे राज्याचे राजकीय वातावरण बंडखोरीमुळे ढवळून निघालेले असताना दुसरीकडे धरणगाव नगरपालिकेत 20 कोटींचा अपहार झाला असून याबाबत धरणगाव जागृत जनमंचचे जितेंद्र महाजन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. दरम्यान, याचिकाकर्ते श्री. महाजन यांच्या वतीने ॲड.भूषण महाजन हे कामकाज बघत आहेत.
धरणगाव पालिकेच्या 2017-18 आणि 2018-19 या दोन वर्षाच्या लेखा परीक्षण अहवालात जवळपास 20 कोटींच्या रकमेची अनियमितता तसेच अफरातफरी नमूद केल्या आहेत. त्या अहवालाच्या अनुषंगाने धरणगाव येथील जागृत जनमंचचे जितेंद्र महाजन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच धरणगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी, नगरविकास विभागाचे सचिव, धरणगाव पोलीस स्टेशन, पोलिस अधिक्षक यांच्याकडे गुन्हा दाखल करणेसाठी तक्रार केली होती. मात्र सर्व ठिकाणी योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने अखेर महाजन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ येथे फौजदारी रिट याचिका क्र.867/2022 दाखल केली असून गुन्हा नोंदविण्यासंदर्भात आदेश करण्याची विनंती केली आहे. याचिकेची सुनावणी 30 जून 2022 रोजी ठेवण्यात आली आहे.
गंभीर स्वरूपाचे आरोप
एकाच कामासाठी पुन्हा-पुन्हा निविदा काढणे, ई-निविदा न काढणे, एकाच कामाचे तुकडे करून कामांची विभागणी, झालेल्या कामाच्या ठिकाणी माहिती फलक न बसविणे, काम न करताच शासनाच्या तिजोरीतील रक्कम वळती करणे, प्रगतीपथावरील कामाची नोंदवही नसणे, पुन्हा पुन्हा निविदा काढून शासकीय रक्कम वळती करणे, त्रयस्थ संस्थेचे प्रमाणपत्र नसणे, आवश्यकता नसताना कर्मचारी लावणे, जुने पावती पुस्तक जमा न करता नवीन पावती पुस्तके वापरणे, विकासकामे अपूर्ण असतांना देयके अदा करणे, धनादेश साठीची नोंदवही नसणे, धनादेश कुणाला दिले याची नोंद नसणे अशा एकूण 479 प्रकारच्या अनियमितता, अपहार व अफरातफरी लेखापरीक्षणात नमूद करण्यात आल्या आहेत.
नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी अनियमिततेला व अपहाराला खतपाणी घातले असून लेखापरीक्षण अहवालाच्या अनुषंगाने तत्कालीन नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व कंत्राटदार यांच्याविरुद्ध बनावटीकरण, फसवणूक, फौजदारीपात्र न्यासभंग अशा सदराखाली गुन्हा नोंदवून पोलीस यंत्रणेकडून निरपेक्ष तपास व्हावा, अशी मागणी जितेंद्र महाजन यांनी केली आहे. याचिकाकर्ते जितेंद्र महाजन यांच्या वतीने औरंगाबाद हायकोर्टात ॲड. भूषण महाजन हे कामकाज बघत आहेत. संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील नागरिकांच्या नजरा या प्रकरणाकडे लागून आहेत.