आषाढी एकादशीच्या वारीत संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) पालखी सोहळ्यातील मानाचे स्थान असलेल्या छत्रपती घराण्याकडून जरी पताका देण्याची परंपरा अखंडित ठेवण्याचा निर्णय कोल्हापूरचे छत्रपती घराणे आणि देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थान यांनी घेतला. रविवारी या मानाच्या जरी पताका पूजन करून मानकरी प्रा. महादेव तळेकर (पंढरपूर) यांच्या सुपूर्द करण्यात आल्यात.
स्वराज्यावर आलेले औरंगजेबरूपी महाभयंकर संकट सलग २६ वर्षे महाराष्ट्राच्या भूमीवर होते. त्याच्यासह निजामशाह, आदिलशाह, इंग्रज, पोर्तुगीज, डच, सिद्धी व अंतर्गत कलह, आदी संकटांचा सामना देत असतानासुद्धा छत्रपतींनी वारकरी संप्रदायाची परंपरा अखंडित व निर्भयपणे सुरू ठेवली. पंढरीच्या वारीमध्ये कधीच खंड पडू दिला नाही. त्याचे प्रतीक म्हणजे या जरी पताका होय. तीच परंपरा पुढे अखंडित सुरू ठेवण्यासाठी भक्ती व शक्ती एकत्रितपणे नांदविण्यासाठी संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे सर्व विश्वस्त व युवराज संभाजीराजे यांच्या सहमतीने शिवकालीन परंपरा पुन्हा सुरू करण्याचा एकमताने निर्णय झाला आहे.
या वर्षीपासून मानाच्या जरी पताकाचे पूजन छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते रविवारी भवानी मंडप, जुना राजवाडा येथे करण्यात आले व पताकाचे मानकरी प्रा. महादेव तळेकर (पंढरपूर) यांच्याकडे त्या सुपूर्द करण्यात आल्यात. या जरी पताका आज, सोमवारी संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानाच्या वेळेला छत्रपती युवराज शहाजीराजे व मानकरी प्रा. महादेव तळेकर यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांचे वंशज यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
भवानी मंडप येथे झालेल्या जरी पताका पूजन सोहळ्यास फत्तेसिंग सावंत, भास्कर तळेकर, बाबूराव तळेकर, धनंजय तळेकर, विजय गावंधरे, पांडुरंग सुरवसे, प्रसन्न मोहिते, विकास देवाळे, प्रवीण पवार, उदय घोरपडे, डी. के. खाडे, उदय बोंद्रे उपस्थित होते.
