जिल्ह्यातील 116 रेशन दुकानदारांचा राजीनामा

0
42

जळगाव ः प्रतिनिधी
जिल्ह्यातील 116 दुकानदारांनी वर्षभराच्या कालावधीत रेशन दुकान चालवण्यास इच्छुक नसल्याने स्वेच्छेने जिल्हा पुरवठा विभागाकडे राजीनामा दिला आहे. रेशन दुकान चालवण्यासाठी कुणी व्यक्ती नसणे, प्रकृती ठीक नसणे, स्वेच्छेने तसेच कंटाळूनही दुकानदारांनी रेशन दुकानाचा राजीनामा दिला असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

रेशन धान्य वाटप ऑनलाइन होत आहे. ई-पॉस मशीनवर अंगठा उमटवल्यानंतर लाभार्थ्यांना धान्य वाटप करणे बंधनकारक आहे. पूर्वीसारखा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार करणे शक्य होत नाही. बहुतांश लाभार्थी जागरूक झालेले असल्याने धान्याचा लाभ सोडत नाहीत.त्यामुळे प्रतिक्विंटल दीडशे रुपये मार्जीनवर रेशन दुकानदारांना अवलंबून राहावे लागत आहे. रेशन दुकानदारांनी राजीनामा देण्यामागे ही सुद्धा कारणे आहेत. लाभार्थींना वाटप करण्यात येणाऱ्या धान्याचे रेकॉर्ड अद्ययावत न ठेवल्यास पुरवठा विभागाकडून कारवाई होत आहे. लाभार्थीही तक्रार करतात. त्यामुळे दुकानदारांना तपासणीला सामोरे जावे लागते. इतर व्यवसाय व रेशन दुकानाचा ताळमेळ बसत नसल्याचे सांगण्यात येते आहे.

ग्रामीणमधील 72 दुकाने
शहरी भागातील 44 तर ग्रामीण भागातील 72 दुकानदारांनी रेशन दुकानाचा जिल्हा पुरवठा विभागाकडे राजीनामे दिले आहे. त्यामध्ये सर्वाधिक प्रत्येकी 15 रेशन दुकानदार पाचोरा व जामनेर तालुक्यातील आहेत. अमळनेर शहरातील 11 रेशन दुकानदारांनी राजीनामे दिले तर चोपडा तालुक्यातील 9 रेशन दुकानदारांनी राजीनामे दिले. राजीनामा देण्यात आलेल्या 116 रेशन दुकानांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. ही दुकाने नव्याने मंजूर करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here