जळगाव ः प्रतिनिधी
काँग्रेसतर्फे राजस्थानातील उदयपूर येथे आयोजित नवसंकल्प शिबिरात ‘भारत जोडो’चा नवसंकल्प करण्यात आला आहे. या अंतर्गत जळगाव जिल्हा काँग्रेसतर्फे जिल्ह्यात 75 किलोमिटर पदयात्राचे आयोजन करण्यात आले आहे.काँग्रेस कार्यकर्ते दररोज 20 किमी पायी चालणार आहेत.या पदयात्रेला 15 ऑगस्टनंतर सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी काल काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
देशातील विषम परिस्थिती आणि आव्हाने लक्षात घेऊन काँग्रेसने शिबिराचे आयोजन केल्याचे सांगितले. धार्मिक आणि जातीय विभाजनाच्या जाळ्यात अडकवून निवडणुकीत हित साध्य करणे हे भाजपचे राजकारण असून तोच मुद्दा या बैठकीत चिंतनाचा विषय होता. विचार मंथनातून सहा विषयांवर सहा गट तयार करण्यात आले. काँग्रेस कार्यकारिणीचे 50 टक्के पदाधिकारी 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे असावेत,या मुद्यावर चर्चा झाल्याचे सांगितले.
यावेळी माजी खासदार डॉ.उल्हासदादा पाटील यांनी केंद्रातील भाजपा सरकार विविध सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले असून महागाई,बेरोजगारी,शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव,महिला सुरक्षितता,संस्थांचे खासगीकरण,आदी विषयांवर समाधानकारक पाऊले उचलण्यास तयार नसल्याने मोदी सरकारबद्दल जनतेत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.त्याचा लाभ येत्या सहकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला निश्चित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेला आमदार शिरीषदादा चौधरी,योगेंद्रसिंग पाटील,विनोद कोळपकर,महानगर अध्यक्ष श्याम तायडे,माजी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीपभैय्या पाटील,उदयसिंग पाटील,सरचिटणीस जमील शेख,युवक काँग्रेसचे देवेंद्र मराठे,ज्ञानेश्वर कोळी,ग्रामीण तालुकाध्यक्ष मनोज चौधरी,अमजद पठाण आदी उपस्थित होते.