मुंबई : प्रतिनिधी
शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी बंड केलं. शिवसेनेसोबत अपक्ष आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे रातोरात सूरतमध्ये पोहोचले. तिथून मग आसामला पोहचले. अशातच महाराष्ट्रातील विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेने जात असल्याचे सूचक ट्वीट शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केले. या सगळ्यात घडामोडींचा मास्टरमाईंड कोण होता? एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे उद्धव ठाकरेच होते का? काँग्रेस राष्ट्रवादीला चेकमेट करण्याचा हा डाव उद्धव ठाकरेंनी आखला होता का? अशी शंकाही आता उपस्थित केली जात आहे. आणि ही शंका उपस्थित होण्यासाठी अनेक कारणे आहेत.
ही बातमी पण वाचा :
एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ४६आमदार आहेत, तसंच ही संख्या ५० पर्यंत जाईल, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या बंडामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. महाविकासआघाडीतून बाहेर पडण्याचा हा शिवसेनेचाच एक्झिट प्लान नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे.
शंका उपस्थित करणारे मुद्दे…
- एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे 80 टक्क्यांपेक्षा जास्त आमदार मातोश्रीला थेट आव्हान कसं देऊ शकतात?
- शिवसेनेची मुख्यमंत्रीपदाची अडीच वर्ष संपली आहेत, जो फॉर्म्युला 2019 ला भाजपला दिला आहे.
- एकीकडे चौकशीचा ससेमिरा, तसंच लोकसभा आणि विधानसभेत शिवसेनेचा थेट राष्ट्रवादीशी होणारा सामना टाळता येऊ शकतो.
- महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर महानगरपालिकेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद या महापालिकांमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. या निवडणुकीत भाजपसोबत थेट सामना झाला आणि मुंबई महापालिकेतली सत्ता जाण्याची भीती?
महाराष्ट्राच्या सत्ता नाट्यात आता नवा ट्वीस्ट आला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्राची विधानसभा बरखास्तीच्या दिशेने चालली आहे, असं खळबळजनक ट्वीट केलं. संजय राऊत यांच्या या ट्वीटनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देतील, अशी शक्यता आहे.
