यावल (सुरेश पाटील)
24 एप्रिल हा दिवस “पंचायती राज दिन” म्हणून साजरा केला जातो या दिवसाचे औचित्य साधून आता राज्यांमध्ये ग्रामसभा आयोजना बरोबरच बाल सभा आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे,त्यासंदर्भात बाल सभा आयोजना विषयी महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायती राज अपर मुख्य सचिव यांनी दि.8 एप्रिल2022रोजी राज्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश काढले आहेत.
अपर मुख्य सचिव यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की 11 ते 18 वयोगटातील बालकांची “बालसभा” सरपंचांच्या अध्यक्षतेखाली दि.24 एप्रिल2022 रोजी स्थानिक सोयीच्या वेळेनुसार आयोजित करावी,बाल सभेचे हजेरीपट व चर्चेला आलेले विषय याची नोंद स्वतंत्र रजिस्टर मध्ये करावी,बाल सभेचा एक फोटो घेण्यात यावा, बालकाच्या विविध समस्या, विचार,मते ऐकून घेऊन बाल सभेमध्ये झालेल्या चर्चेची व निर्णयाची नोंद संबंधित रजिस्टर मध्ये करावी,बाल सभेमध्ये घेतलेल्या निर्णयाची व झालेल्या चर्चेची माहिती ग्रामसभेचे पुढे मांडावी व ग्रामसभेमध्ये बालकांच्या विविध समस्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यात यावेत.
शाश्वत विकासाची ध्येय सन 2030 पर्यंत प्राप्त करण्याच्या अनुषंगाने प्रत्येक ग्रामपंचायतीने आपली पंचायत “बालस्नेही पंचायत”बनवणे अपेक्षित आहे त्याबाबतचा प्रस्ताव ग्रामसभेपुढे ठेवून चर्चा करावी.
बाल सभा आयोजन करताना पुढील विषयावर बालकांमध्ये चर्चा घडवून आणावी बालविवाह,बालमजुरी धोरणामुळे निर्माण झालेल्या बालकांविषयीच्या विविध समस्या व त्यावर उपाय योजना,बालकांचे हक्क व त्यांची अंमलबजावणी, बालकांसाठी असणाऱ्या शासकीय योजना व त्यासाठी पात्रता असणाऱ्या बालकांची यादी,पंधराव्या वित्त आयोगांतर्गत बालकाचा निर्णय प्रक्रियेत सहभाग व 10%निधी उपयोगाबाबत बालकांच्या सूचना, बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी गावपातळीवर नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यासंदर्भात चर्चा घडवून आणणे.यासंदर्भात योग्य ती कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायती राज अप्पर मुख्य सचिव यांच्याकडे सादर करावा असे ग्राम विकास व पंचायती राज अपर मुख्य सचिव यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.