दिल्ली : पक्षांतर करणाऱ्या आमदारांवर पुढील पाच वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी टाका, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ही याचिका मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या महिला नेत्या जया ठाकूर यांनी दाखल केली आहे. शिवसेनेचेनेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात सत्तापेच निर्माण झालेला असताना या याचिकेला विशेष महत्त्व आले आहे. या याचिकेवर २९ जून रोजी याचिकेवर सुनावणी होणार आहे.
सभागृहाचा सदस्य दहाव्या अनुसूचीनुसार अपात्र ठरविण्यात आला असेल तर त्याला पुढील पाच वर्षासाठी निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच मुद्द्यावर जानेवारी २०२१ मध्ये रिट याचिका दाखल करण्यात आली होती. त्यांच्या रिट याचिकेवर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली होती. आता महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा दाखला देत जया ठाकूर यांनी आपल्या जुन्याच रिट याचिकेत नवा अर्ज दाखल करत कोर्टाचं लक्ष वेधून घेतले आहे. सुप्रीम कोर्टानं देखील याची दखल घेतली आहे.
निवडून आलेल्या आमदारांनी पक्षांतर करणे हा आता देशपातळीवर नवा ‘पॅटर्न’ बनला आहे. महाराष्ट्रातही आज तेच पाहायला मिळत आहे. त्यामुळे बंडखोर उमेदवारांना चपराक बसावी आणि जनतेच्या मताचा आदर व्हावा यासाठी सुप्रीम कोर्टानं निर्णय घेणं महत्वाचं आहे, असं जया ठाकूर यांनी याचिकेत म्हटले आहे.



