नवी दिल्ली, वृत्तसंस्था । रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना एका तासाच्या आत रुग्णालयात पोहोचविणाऱ्यांसाठी एक खास योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत संबंधित मदत करणाऱ्या व्यक्तीला 5,000 रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे, असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने म्हटले आहे.
यासंदर्भात, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि परिवहन सचिवांना पत्र लिहिले आहे. यात, ही योजना 15 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2026 पर्यंत लागू असेल, असे म्हणण्यात आले आहे.
मंत्रालयाने सोमवारी, प्रामाणिकपणे मदत करणाऱ्यांना बक्षीस देण्याच्या या योजनेसंदर्भात नियमावलीही जारी केली आहे. मंत्रालयाने म्हटले आहे, की आणीबाणीच्या स्थितीत रस्त्यावरील अपघात ग्रस्तांना मदद करण्यासाठी सामान्य नागरिकांना प्रोत्साहन देणे, हा या योजनेचा हेतू आहे.
या योजनेंतर्गत, संबंधित मदत करणाऱ्या व्यक्तीला रोख पुरस्कारासोबतच एक प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. एवढेच नाही, तर या पुरस्काराशिवाय, राष्ट्रीय स्तरावर 10 सर्वात प्रामाणिकपणे सहकार्य करणाऱ्यांना एक-एक लाख रुपयांचा पुरस्कारही देण्यात येणार असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.