शेतकर्‍यांना खरिप हंगामासाठी रास्त भावात खते व बियाणे द्या

0
3

मुक्ताईनगर : प्रतिनिधी
खरीप हंगामाची लगबग सुरू असतांना बियाणे व खतांच्या किंमती वाढल्याने शेतकरी त्रस्त झालेले आहेत. याची दखल घेऊन जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ऍड.रोहिणीताई खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व कृषी मंत्र्यांना पत्र लिहून खरिप हंगामासाठी शेतकर्यांना उच्च उगवण क्षमता असणारे बियाणे रास्त भावात उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी केली आहे.
याबाबत वृत्त असे की, यंदाचा खरिप हंगाम जवळ आला असुन पेरणीपुर्व शेती मशागतीच्या कामांनी वेग घेतला आहे. परंतु पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते यांच्यासाठी लागणार्या आर्थिक बाबींची जुडवणुक करण्यासाठी शेतकरी बांधव लागला आहे. परंतु केंद्र शासनाने रासायनिक खतांवरील सबसिडी कमी केल्या मुळे खत उत्पादक कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किंमतीत मोठी भाववाढ केली आहे. यामुळे शेतकर्यांचे आर्थिक कंबरडे मोडणार आहे.
शेतकर्यांच्या या समस्येची दखल घेऊन जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषी मंत्री दादाजी भुसे यांना पत्र लिहुन केंद्राकडे पाठपुरावा करून खतांच्या वाढीव किंमती कमी करण्यात याव्या व येत्या खरिप हंगामासाठी शेतकर्यांना उच्च उगवण क्षमता असणारे बियाणे रास्त भावात उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी केली आहे.
ऍड.रोहिणीताई खडसे यांनी या पत्रात म्हटले आहे की, खरीप हंगाम जवळ आला असून शेतकरी बांधव पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागले आहेत. परंतु गेल्या वर्षापासून कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. गेल्या खरीप हंगामात पाऊस चांगल्या प्रमाणात होऊनही उत्पादनात घट आल्याने आणि शेत मालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी बांधवांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे.
यंदाचा खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकरी बियाणे आणि खते खरेदीसाठी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यातच रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ झाली असल्या कारणाने शेतकर्यांचे या खरीप हंगामाचे संपूर्ण आर्थिक नियोजन कोलमडून जाण्याची शक्यता आहे. केमिकल व फर्टीलायझरचे केंद्रीय मंत्री मनसुख मंडविया यांनी रासायनिक खतांच्या किमतीत कोणतीही वाढ होणार नाही, असे सर्व खत कंपन्यांच्या बैठकीत निर्णय झाला असल्याचे सांगितले होते. परंतु खत कंपन्यांनी अचानक खतांच्या किमतीत मोठी दरवाढ केल्यामुळे शेतकरी बांधव संकटात सापडले आहेत. तरी आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून खतांची ही दरवाढ रद्द करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे.
दरम्यान, खरीप हंगाम सुरु होण्यावर आला असून शेतकर्यांकडे योग्य प्रतीचे बियाणे उपलब्ध नसतात. शेतकरी दरवर्षी पेरणीच्या वेळी बाजारातून बियाणे खरेदी करतो. या बियाण्यांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. तसेच यातील काही बियाण्यांचा दर्जा निकृष्ट असतो. त्यांची उगवण क्षमता कमी असते. या निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे शेतकर्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागते. त्यामुळे शेतकरी बांधव अजून आर्थिक गर्तेत अडकतो. तरी आपण आपल्या स्तरावरून उचित कार्यवाही करून, उच्च प्रतीची उगवण क्षमता असणारे बियाणे योग्य किमतीत शेतकरी बांधवांना उपलब्ध करून द्यावे व खत व बियाण्यांच्या विक्रीत, किमतीत ,पुरवठ्यात काळा बाजार होऊ नये, यासाठी या लिंकिंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर विशेष पथकाची नेमणूक करावी, अशी मागणी ऍड. रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी या पत्रात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here