जळगाव जिल्ह्यातील पर्यटनस्थळांंचे भाग्य उजळणार तरी कधी?

0
4

जळगाव जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास ज्या गतीने व्हायला पाहिजे त्या गतीने होत नसल्याचे जाणवत आहे.जिल्ह्यात जी पर्यटनस्थळे आहेत,ती विकसीत व्हावी अशी जिज्ञासा लोकप्रतिनिधींमध्ये असणे आवश्यक आहे मात्र जिल्ह्यातील काही काळ सोडला तर बहुअंशी लोकप्रतिनिधींनी त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसत आहे.यासाठी गेल्या ५० वर्षात आवश्यक तो निधी उपलब्ध झाला असता तर जिल्ह्यातील पर्यटने स्थळे पूर्णपणे विकसीत होऊन पर्यटनाला प्रोत्साहन मिळाले असते तसेच राज्य शासनाच्या तिजोरीत निश्चितच भर पडली असती आणि त्याचबरोबर लहान व्यावसायिकांना,महिला बचत गटांनादेखील आर्थिक पाठबळ मिळाले असते व पर्यायाने रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या असत्या.पण याकडे लक्ष देऊन पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता बोटावर मोजण्याइतपत लोकप्रतिनिधी सोडले तर कोणालाही त्याची आवश्यकता वाटली नसावी,असे चित्र दिसत आहे.
जळगाव जिल्ह्यात प्रामुख्याने रावेर येथील पाल,एरंडोल तालुक्यातील पद्मालय,भीमकुंड आणि फरकांडे येथील झुलते मनोरे,चोपडा तालुक्यातील उनपदेवचा गरम पाण्याचा झरा,चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी,मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळीचे मुक्ताई मंदिर,चांगदेव येथील मंदिर व तापी-पूर्णा संगम स्थळ,यावल तालुक्यातील मनुदेवी मंदिर,जळगाव तालुक्यातील रामेश्वरम्‌‍‍ आणि तापी,गिरणा व अंजनी नदीचा त्रिवेणी संगम स्थळ,अमळनेर येथील संत सखाराम महाराज मंदिर आणि मंगळग्रह मंदिर,जळगावच्या मोहाडी रोडवरील लांंडोरखोरी वनउद्यान आदी धार्मिक व पर्यटनस्थळे आहेत.त्यातील बहुसंख्य स्थळांची अवस्था शोचनिय झाली आहे तर काही स्थळांची विकासाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे पण ती फारच संथगतीने.त्यामुळे जळगाव जिल्हा पर्यटनस्थळांच्या विकासाच्यादृष्टीने मागे पडतो की काय,अशी स्थिती दिसत आहे.
सध्याच्या राज्य मंत्रीमंडळात गिरीष महाजन,गुलाबराव पाटील व अनिल भाईदास पाटील यांच्या रुपाने तीन कॅबिनेट मंत्री आहेत.त्यामुळे जळगाव जिल्ह्याचे राज्य मंत्रीमंडळात वजनदार स्थान आहे असे मानण्यास हरकत नाही.राज्यात भाजपा,शिवसेना(शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) या तीन पक्षांचे सरकार आहे.त्यामुळे जळगाव जिल्ह्यालाही तीन मंत्रीपदे लाभली आहेत त्यात गिरीष महाजन(भाजपा),गुलाबराव पाटील(शिवसेना-शिंदे गट)आणि अनिल भाईदास पाटील(राष्ट्रवादी अजित पवार गट)यांचा समावेश आहे.विशेष बाब म्हणजे गिरीष महाजन यांच्याकडे ग्रामविकास खात्याबरोबरच पर्यटन खातेही आहे आणि गुलाबराव पाटील हे जिल्हा पालकमंत्री आहेत तसेच अनिल भाईदास पाटील यांचे नेते अजित पवार हे स्वतः उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री आहेत.त्यामुळे तिन्ही मंत्र्यांनी मनावर घेतले तर जळगाव जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास झपाट्याने होऊ शकतो व त्यासाठी आवश्यक तो निधी हे तिन्ही मंत्री आपले वजन सरकार दरबारात वापरुन सहजगत्या उपलब्ध करुन घेऊ शकतात पण त्यासाठी त्यांनी पर्यटनस्थळाच्या विकासाचा मुद्दा मनावर घेण्याची गरज आहे तसेच त्या-त्या भागातील नागरिकांनी मंत्रीत्रयींजवळ आग्रहाची भूमिका घेण्याची आवश्यकता आहे.त्यासाठी सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेतला पाहिजे तरच जिल्ह्यातील रेंगाळलेला पर्यटनस्थळांच्या विकासाला काही प्रमाणात का होईना गती मिळाल्याशिवाय राहणार नाही.
गिरीष महाजन हे स्वतः पर्यटनमंत्री असल्याने त्यांनी यावर्षी जिल्ह्यातील काही पर्यटनस्थळांच्या विकासासाठी काही प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला असला तरी तो पुरेसा नाही तसेच काही पर्यटनस्थळांना निधी देतानाच सर्व पर्यटनस्थळांची पाहणी करुन एकूण किती निधीची आवश्यकता आहे याचा आढावा घेऊन राज्य सरकारच्या तिजोरीतून विशेष तरतूद म्हणून खास निधी मिळावा यासाठी आग्रही भूमिका घेतल्यास निश्चितच जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासाला गती प्राप्त होऊ शकते.त्यासाठी आवश्यकता आहे ती मनापासून प्रयत्न करण्याची.
ना.गिरीष महाजन यांनी पर्यटनमंत्री म्हणून सुत्रे हाती घेतल्यानंतर जळगाव जिल्ह्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला असला तरी तो पुरेसा नाही.गेल्या २०२२-२३ मध्ये जिल्ह्यासाठी २३ कामांसाठी ६८.८० कोटी निधीला प्रशासकीय मंजूरी देण्यात आली होती.त्यापैकी ३६.१४ कोटी प्राप्त झाले असून ७.३३ लाख रु.चा निधी खर्च झाला आहे.यंदा २३-२४ साठी जिल्ह्यातील ११० कामांसाठी २६२ कोटींचे प्रशासकीय प्रस्तावांना मंजूरी मिळाली असून त्यापैकी ९४ कोटी प्राप्त झाले आहे तसेच १८ कोटीचे वितरण होऊन खर्चीही पडले आहेत,अशी माहिती जिल्हा नियोजन समिती कार्यालयाच्या सुत्रांकडून प्राप्त झाली.प्रशासकीय मंजुरी व जिल्ह्यातील पर्यटन स्थळ विकासावर होणारा प्रत्यक्ष निधी यातील तफावत पाहता ,हा पूर्ण निधी कसा खर्ची पडेल,यावर भर देण्याची आवश्यकता जाणवत आहे.जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा सर्वांगिण विकास करुन पर्यटनाला चालना देण्यासाठी स्वतः पर्यटनमंत्री ना.गिरीष महाजन यांनी जातीने लक्ष देऊन व सरकारी तिजोरीतून जळगाव जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी आपले वजन शासन दरबारी वापरावे अशी अपेक्षा जिल्ह्यातील पर्यटनप्रेमी व्यक्त करीत असतील तर त्यात चुकीचे काही नाही.

श्री मंगळग्रह देव मंदिर
अमळनेरचे श्री मंगळ देव मंदिर हे संपूर्ण भारतातील मंदिरांपैकी सर्वात प्राचीन, सर्वात दुर्मिळ आणि सर्वात ‘थेट’ (मंदिर जेथे लोकांच्या इच्छा आणि इच्छा पूर्ण होतात) एक आहे.अमळनेर येथील मंगळ देव ग्रह मंदिर कोणी बांधले आणि मूर्तीची स्थापना केव्हा झाली? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. काहींच्या मते १९३३ मध्ये पहिल्यांदा मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.१९४० नंतर मंदिर पुन्हा एकदा विस्मृतीत गेले आणि जीर्णावस्थेत पोहोचले. १९९९ पर्यंत मंदिराचा परिसर शहरातील कचऱ्यासाठी डंपिंग ग्राउंड म्हणून वापरला जात होता. हे गुन्हेगार आणि इतर समाजकंटकांचे अड्डेही होते. ही वस्तुस्थिती अविश्वसनीय वाटत असली तरी दुर्दैवाने सत्य आहे. १९९९ नंतरच्या नूतनीकरणाने मंदिर आणि त्याच्या परिसरात चमत्कारिकरीत्या आनंददायी परिवर्तन घडवून आणले आहे. गेल्या ५ ते ७ वर्षात या ठिकाणच्या आणि सुविधांच्या विकासाचा वेग अनेक पटींनी वाढला आहे.

श्री क्षेत्र पद्मालय
देशभरात प्रसिध्द असलेल्या गणपती मंदिरापैकी एक महाभारत कालीन श्री क्षेत्र पद्मालय गणपतीचे मंदिर. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात हे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरामुळे एरंडोल तालुक्याची वेगळी ओळख देशभरात निर्माण झाली असून दररोज हजारो भाविक या ठिकाणी गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. मंदिराचा परिसर घनदाट जंगल, जवळ असलेल्या तलाव, तलावातील विविध प्रकारचे रंगबिरंगी कमळाचे फुल हे भाविकांना आकर्षीत करतात.एरंडोल गावापासून केवळ अकरा किलोमीटर अंतरावर असलेले श्री क्षेत्र पद्मालय देशभरात प्रसिध्द आहे. श्री गणेशाच्या साडेतीन पिठांपैकी एक हे श्री क्षेत्र
आहे.

मंदिराला महाभारताचा इतिहास
महाभारताच्या काळात पांडव अज्ञातवासेत असतांना या ठिकाणी तलावात आंघोळीसाठी येत असत अशी काल्पनिक अख्यायिका आहे तसेच पांडवकाळात भिम व बकासुराचे युद्ध झाल्याची काल्पनिक कथा आहे. बकासुराचा वध केल्यानंतर भिमाला तहान लागल्याने त्याने आपल्या मुठीचा जोरदार प्रहार खडकावर केल्याने त्या ठिकाणी खोल खड्डा पडला.त्यास भीमकुंड म्हणून ओळखले जाते.भीमकुंड परिसरात आजही भाताचा कण असल्याच्या पांढऱ्या खुणा आढळून येतात. एरंडोल शहरात असलेल्या पांडववाड्यातून श्री क्षेत्र पद्मालय येथे जाण्यासाठी भुयारी मार्ग असल्याचे
सांगितले जाते.

फरकांडेतील झुलते मनोरे
स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले फरकांडे येथील झुलते मनोरे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. तीन घुमटांच्या मशिदीचे पुढील दोन मिनार म्हणजेच झुलते मनोरे मात्र, सध्या ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
तसं पाहिलं तर फरकांडे येथील या प्रार्थनास्थळाच्या परिसरात असलेली अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य यामुळे तुमचा कदाचित हिरमोड होऊ शकतो पण शासनासह परिसरातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या उदासीनतेमुळे हे ठिकाण नामशेष होत आहे. त्यामुळे पूर्वजांनी उभारलेल्या या अद््‌‍‍भुत कलाकृती नामशेष होण्याआधी नजरेत सामावणे गरजेचे आहे.
जळगाव- धुळे महामार्गावर जवळपास ३० किलोमीटरवरील एरंडोल हे तालुक्याचे ठिकाण. येथून जवळपास १२ किलोमीटरवर कासोदा आणि तीन किलोमीटरवर फरकांडे गाव आहे. तीन घुमटांच्या मशिदीचे पुढील दोन मिनार म्हणजेच झुलते मनोरे. आता यातील एक मनोरा २१ मार्च १९९१ रोजी कोसळल्याने फक्त एकच मनोरा राहिला आहे. तोही शेवटच्या घटका मोजत आहे.

संत मुक्ताबाई मंदिर
संत मुक्ताबाई (जन्म : आपेगाव, महाराष्ट्र, इ.स.१२७९; समाधी : मेहूण (जळगाव जिल्हा), इ.स. १२९७) या महाराष्ट्रातील संत व कवयित्री होत्या. ह्या मुक्ताई या नावानेही ओळखल्या जातात. संत निवृत्तिनाथ,संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते.
संत मुक्ताबाई ह्या संत ज्ञानेश्वरांच्या धाकट्या बहीण म्हणून सर्वांना परिचित आहेत. त्यांनी रचिलेले ताटीचे अभंग हे त्यांच्या नावावर नोंदविलेले आहेत. या अभंगांमध्ये त्यांनी संत ज्ञानेश्वरांना काही बोध दिला आहे. त्या योगी चांगदेवांच्या गुरू होत्या.त्यांनी ज्ञानबोध या ग्रंथाचेही लेखन केले आहे. ज्ञानदेव-भगिनी मुक्ताबाईचे मराठी संतमंडळातील स्थान अनन्यसाधारण आहे.

मनुदेवी मंदिर
जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा हा पर्वत असून सुर्यकन्या तापी नदीचा हा भूसंपन्न परिसर. यावल ते अंकलेश्वर महामार्गावर चोपडा ते यावल राज्य रस्त्याच्या चिंचोली- किनगावच्या पश्चिम दिशेला उत्तरेस आडगाव फाटा आहे. या आडगाव फाट्यापासून श्रीमनुदेवी तिर्थक्षेत्र अवघे ९ किलोमीटर वर आहे. या आडगाव फाट्यापासून श्रीमनुदेवी तिर्थक्षेत्राकडे जातांना ६ किलोमीटरवर श्री हनुमानाचे मंदिर आहे.श्री हनुमान मंदिराजवळ सुंदर पाझर तलाव आहे.श्री हनुमान मंदिरापासून श्रीमनुदेवी तिर्थक्षेत्र हे जवळपास ३ किलोमीटरवर आहे.जळगांव ते श्री मनुदेवी मंदिर हे ३५ कि.मी.आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here