जिल्हा बँकेकडून 31 मार्चपूर्वी कर्जफेडीवर शून्य व्याज
जळगाव ( प्रतिनिधी )
जिल्ह्यातील सर्व विकास कार्यकारी सोसायटी व जिमस बँकेच्या वैयक्तिक कर्जदार शेतकरी सभासदांनी 2024-25 या चालू आर्थिक वर्षात घेतलेल्या पीक कर्जाच्या फक्त मुद्दल रकमेचा भरणा 31 मार्चपूर्वी केल्यास शून्य व्याजाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जफेड करून फायदा करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना कर्जाची रक्कम मुदतीत भरता यावी म्हणून बँकेने 30 आणि 31 मार्च या सुटीच्या दिवशी सर्व शाखा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जदार सभासदांनी या सोयीचा लाभ घ्यावा आणि कर्ज वेळेत परतफेड करून पुढील पत वाढल्याच्या आधारावर नवीन पीककर्ज घेण्यास पात्र व्हावे. थकबाकीदारांसाठी एकरकमी परतफेड योजना आहे. कर्ज खाते 31 मार्च पूर्वी निकाली काढल्यास शेतकरी नवीन कर्ज घेण्यास पात्र ठरतील.
बँकेने 2024-25 या कालावधीत प्राथमिक कृषि पतसंस्था व थेट कर्जवाटपाच्या माध्यमातून 2 लाख शेतकऱ्यांना 1052 कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित केले आहे. यात 1 लाख 59 हजार सभासदांना पतसंस्थांमार्फत 714 कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले असून, 41 हजार शेतकऱ्यांना बँकेमार्फत थेट 238 कोटी रुपयांचे कर्ज दिले गेले आहे. मात्र, प्राथमिक कृषि पतसंस्थांच्या 87 हजार शेतकरी सभासदांकडे अद्याप 477 कोटी रुपयांची थकबाकी आहे.