शेतीच्या वादातून चाकूने वार : तरुणाचा मृत्यू
जळगाव (प्रतिनिधी)-
येथील सदाशिवनगरात शेतीला वारस लावण्यावरून वाद होऊन शालकांनी मेहुण्यावर शुक्रवारी चाकूने वार करून गंभीर जखमी केले होते. त्यात या तरुणाचा सोमवारी पहाटे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दोन्ही शालकांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तौफिक कय्यूम पिंजारी (वय-३२) असे मयत तरुणाचे नाव आहे. सदाशिवनगरात मालवाहू रिक्षाचालक असलेले तौफीक पिंजारी कुटुंबासह वास्तव्याला होते. तौफीक पिंजारी व त्यांचे मेहुणे अस्लम समशोद्दीन पिंजारी व शफिक गफूर पिंजारी यांच्यामध्ये शेतीला वारस लावण्यावरून वाद झाले होते. शुक्रवारी तौफीक यांच्या सदाशिवनगरातील घरी जाऊन त्यांना दोघांनी शिवीगाळ व मारहाण केली होती. अस्लमने तौफीकच्या पोटाच्या डाव्या बाजूला कमरेजवळ चाकूने वार केला होता. गंभीर दुखापत झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी रात्री त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दुसऱ्या खासगी रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला.
त्यानुसार त्यांना तेथे नेले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्याचे सांगण्यात आले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.