किरकोळ वादातून दोन गटात राडा; परस्पर विरोधात गुन्हे
जळगाव (प्रतिनिधी)-
घरासमोरील रस्त्यावर काचेच्या बाटल्या फेकू नका असे सांगितल्याचे वाईट वाटल्याने दोन गटामध्ये तुफान राडा झाला. दोन्ही गटाकडून एकमेकांच्या घरावर दगडफेक करुन लाकडी दांडक्याने मारहाण केली. दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारीवरुन परस्परविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या गटातील वर्षा बागडे (वय २३, रा. जाखनीनगर, कंजरवाडा) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन, १ रोजी रात्री काही तरुण त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर काचेच्या बाटल्या फेकत होते. त्यांना वर्षा बागडे यांनी घरासमोर बाटल्या फेकू नका असे सांगितले. त्याचा राग आल्याने आठ जणांच्या टोळक्याने बागडे यांना शिवीगाळ केली. त्यावेळी निलेश बागडे याला लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी केले. त्यांच्या घरावर दगडफेक करुन साहित्याची नासधूस केली. दगडफेक करतांना दगड निलेश बागडे याच्या छातीवर लागल्यामुळे तो जखमी झाला आहे.
दुसऱ्या गटातील शिंगी दहेकर (वय ३८, रा. जाखनीनगर, कंजरवाडा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जून्या वादातून आठ जणांच्या टोळक्याने दहेकर यांच्या घरावर दगडफेक केली. यावेळी त्यांचे पती आकाश व दोन्ही मुलांना शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने मारहाण केली.
पहिल्या गटाने दिलेल्या तक्रारीवरुन आकाश दहियेकर, टारझन दहियेकर, विक्की दहियेकर, प्रकाश दहियेकर, वीर दहियेकर, गोविंद दहियेकर, अनमोल दहियेकर, रोहीत रावळकर (सर्व रा. जाखनीनगर, कंजरवाडा) तर दुसऱ्या गटाच्या तक्रारीवरुन निलेश बागडे, मयूर बागडे, राकेश बागडे, सनी बागडे, अंकुश माचरे, विकास बागडे, जितू घमंडे, विक्की बागडे (सर्व रा. जाखनीनगर, कंजरवाडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक मोहन पाटील करीत आहे