भुसावळ : प्रतिनिधी
तालुक्यातील कंडारी येथे घडलेल्या हत्याकांडातील जखमी तिसऱ्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावंडांची शुक्रवारी रात्री निर्घृण हत्या केली होती. या घटनेतील एका जखमीचा उपचारादरम्यान रविवारी, ३ सप्टेंबर रोजी पहाटेेच्या सुमारास मृत्यू झाल्याने हत्याकांडातील मृतांची संख्या तीन झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. कंडारीतील हत्येप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे.
सविस्तर असे की, भुसावळ तालुक्यातील कंडारी गावातील शांताराम भोलानाथ साळुंखे (वय ३३) आणि राकेश भोलानाथ साळुंखे (वय २८) या वीटभट्टी कामगार भावंडांची जुन्या वादातून दहा संशयितांनी चाकू, तलवार व लोखंडी रॉड डोक्यात मारून निर्घृण हत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कंडारी गावातील महादेव टेकडी परिसरातील पूजा पान सेंटरजवळील वखारीजवळील चौकात घडली होती. या घटनेत रमेश अमोल इंगळे (वय ३२, सर्व रा.कंडारी) हे व विकी साळुंखे (वय ३०) हे जखमी झाले होते. त्यातील रमेश इंगळे यांचा उपचार सुरू असताना गोदावरी रुग्णालयात रविवारी पहाटे तीन वाजता मृत्यू झाला.
खून प्रकरणी विकास साळुंखे यांच्या फिर्यादीवरून दीपक छगन तायडे, मनोज श्रावण मोरे, अमोल कोळी, मयूर कोळी, देवी भील, किरण सपकाळे यांच्यासह अन्य चार अनोळखींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, खून प्रकरणी दीपक छगन तायडे, मनोज श्रावण मोरे, किरण सपकाळे (तिन्ही रा. कंडारी, ता. भुसावळ) अशा तीन संशयितांना अटक केली
आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी
धाव घेऊन केली पाहणी
खुनाची घटना समोर आल्यानंतर जळगाव पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित, एलसीबी पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील, भुसावळ शहरचे पोलीस निरीक्षक गजानन पडघण, बाजारपेठचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.