कोल्हापूर ः वृत्तसंस्था
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी आई अंबाबाईचे भक्तांसाठी कोरोना काळापासून पितळी उंबराच्या बाहेरून सुरू असलेले दर्शन हे आता उद्यापासून गाभाऱ्यातून सुरू होणार आहे. याबाबतची घोषणा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली असून यामुळे गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून लांबून आईचे सुरू असलेेलेे दर्शन हे आता भक्तांना गाभाऱ्यातून घेता येणार असल्याने भक्तांमधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरात दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. भक्तांना आईचे दर्शन जवळून व्हावे यासाठी गाभाऱ्यातून दर्शन देण्याची व्यवस्था पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून करण्यात आली होती मात्र कोरोना काळात सुरक्षेच्या कारणास्तव ही रांग बाहेरून म्हणजे पितळी उंबरा येथून वळविण्यात आली होती.यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पितळी उंबराच्या आतून दर्शन पुन्हा सुरू करावे यासाठी भक्तांकडून अनेक निवेदन व विनंती करण्यात येत होती. अखेर तब्बल दोन ते अडीच वर्षानंतर पुन्हा अंबाबाईचे दर्शन आतून सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून याबाबतची घोषणा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज केली आहे. यामुळे भक्तांमधून समाधान व्यक्त करण्यात येत असून अंबाबाई मंदिरात देखील दर्शन रांगेत बदल आणि भक्तांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.अखेर उद्यापासून हे दर्शन सुरू होणार असून भक्तांमधून समाधान व्यक्त
होत आहे.