एरंडोल : प्रतिनिधी
युनिट २८६ मिडीयम रेजिमेंट तोफखाना कारगिल येथे कार्यरत असलेले जळगाव जिल्ह्यातील तळई(एरंडोल) येथील हवालदार नितीन तुळशीराम पाटील शहीद झाले आहेत. त्यांच्यावर तळई येथे शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.शहिद पित्याच्या पार्थिवाला मुखाअग्नी त्यांच्या दोन्ही मुली समृद्धी व काव्या पाटील यांनी दिला. शहीद जवानाला गावातील तरुणांनी पाचशे मीटर लांबीचा तिरंगा हातात धरून संपूर्ण गावातून अंत्यसंस्काराच्या ठिकाणापर्यंत तिरंगा रॅली काढण्यात आली.
संपूर्ण गाव ”वीर जवान अमर रहे”, अशा घोषणांनी दुमदुमले होते. यावेळी संपूर्ण गावात महिलांनी आपल्या घरासमोर रांगोळ्या काढल्या. शासकीय मानवंदना देण्यात येऊन जवानाला अखेरचा निरोप देण्यात आला.
अंत्यविधीसाठी युनिट २८६ मिडीयम रेजिमेंट कारगिल गनर्ससोबत नायब सुभेदार मुलानी रहीम, बीएचएम चंद्रशेखर काळे, हवालदार विनोद पाटील, स्टेशन हेडकॉटर भुसावळतर्फे हवालदार महेशकुमार नायक, भूषण पाटील, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय जळगावचे नितीन पाटील,रतिलाल महाजन, लक्ष्मण मनोरे या अधिकाऱ्यांनी तसेच पोलीस दलातर्फे हवेत तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी नितीन तुळशीराम पाटील यांना अखेरचा निरोप देण्यासाठी गावातील तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.