हांगझाऊ : वृत्तसंस्था
महाराष्ट्राच्या ऋतुजा भोसलेने इतिहास रचला आहे. कारण ऋतुजाने आशियाई क्रीडा स्पर्धेत टेनिसमधील मिश्र दुहेरी गटामध्ये भारताला सुवर्णपदक जिंकवून दिले आह.ऋतुजाला यावेळी रोहन बोपण्णाने सुरेख साथ दिली आणि त्यामुळेच भारताला हे सुवर्णपदक जिंकता आले आहे.
चीनमधील हँगझोऊ येथे आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताने सुवर्णपदक जिंकले आहे. रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले या जोडीने मिश्र दुहेरी टेनिसमध्ये सुवर्णपदक पटकावले. भारतीय जोडीने अंतिम फेरीत तैपेई जोडीचा २-६, ६-३, १०-४ असा पराभव केला. पहिल्या सेटमध्ये भारताच्या ऋतुजाआणि रोहन यांना पराभव पत्करावा लागला होता पण या दोघांनी हार मानली नाही.या दोघांनी दुसऱ्या सेटमध्ये दमदार पुनरागमन केले आणि हा सेट ६-३ असा जिंकला. त्यांनतर तिसरा सेट हा निर्णायक होता पण दुसऱ्या सेटनंतर ऋतुजा आणि रोहन यांच्या खेळात चांंगली आक्रमकता आली होती. या गोष्टीचा फायदा त्यांना तिसऱ्या सेटमध्ये झाला. ऋतुजा आणि रोहन यांनी तिसरा सेट १०-४ असा जिंकत सुवर्णपदक पटकावले.
नेमबाजीत रौप्यपदक
तत्पूर्वी, सरबज्योत सिंग आणि दिव्या थडीगोल या जोडीने नेमबाजीतील १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. सुवर्णपदकाच्या लढतीत भारतीय जोडीला चीनच्या झांग बोवेन आणि जियांग रॅनक्सिन यांच्याविरुद्ध १४-१६ असा पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे, महिला बॉक्सर प्रीती पवार आणि ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेन यांनी आपापल्या उपांत्यपूर्व फेरीतील सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चे तिकीट मिळवले. ९ सुवर्ण, १२ रौप्य आणि १३ कांस्य अशी एकूण ३५ पदके जिंकून भारत पदकतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. चीन १०५ सुवर्ण, ६३ रौप्य आणि ३२ कांस्य अशी २०० पदके जिंकून अव्वल स्थानावर आहे.
