साईमत जळगाव प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीमार समर्थनीय नसून, यात चौकशीत निष्पन्न झालेल्या दोषींना शिक्षा होईलच. मात्र, विरोधक हे सत्तेत असतानाही ते मराठा आरक्षण देऊ शकले नाहीत. त्यांना आता समाजाविषयी कळवळा वाटत असून, त्यांचे प्रेम पुतणा-मावशीचे आहे. यात राजकारण करू नका, असे आवाहन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केले.
जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अद्ययावत शस्त्रक्रियागृहाच्या उद्घाटनानंतर ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिकास्त्र सोडले. जालना जिल्ह्यात मराठा समाजाचे आंदोलन सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चाही केली. सर्व त्यांच्या संपर्कात होते. गेल्या चार-पाच दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरू होते.
मीसुद्धा दोन दिवसांपासून त्यांच्या संपर्कात होतो. पाच दिवसांपासून उपोषणामुळे त्यांची तब्येत खालावली होती. डॉक्टरांनीही सांगितले होते, अजून दोन दिवस उपोषण सुरू राहिल्यास त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. मुख्यमंत्री शिंदे हे २० मिनिटे उपोषणकर्त्यांशी बोलले होते. मीही त्यांच्याशी बोललो. मी येतो आणि चर्चा करू. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटू; पण ते होऊ शकले नाही. सरकारला उपोषणकर्त्यांचा जीव वाचविणे महत्त्वाचे होते.