आता पाकिस्तानातून आयातीवरही बंदी
नवी दिल्ली (न्युज नेटवर्क )-
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कडक कारवाईसाठी पडद्यामागून तयारी सुरु असली, तरी पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी सुरुच ठेवली आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढत असल्याने भारताने पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली आहे.
परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने म्हटले आहे की ही बंदी तत्काळ लागू होईल. सर्व वस्तूंची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयात किंवा वाहतूक, मुक्तपणे आयात करता येण्याजोगी असो वा नसो, पुढील आदेशापर्यंत तत्काळ प्रभावाने प्रतिबंधित करण्यात आली आहे. कोणत्याही अपवादासाठी भारत सरकारची पूर्व परवानगी आवश्यक असेल, असे अधिसूचनेत म्हटले आहे.
व्यापार बंदीमुळे पाकिस्तानच्या निर्यात क्षेत्राला दणका बसणार आहे. सिमेंट, कापड आणि कृषी उत्पादनांसाठी ते सीमापार व्यापारावर अवलंबून आहेत. अनौपचारिक व्यापार मार्ग देखील विस्कळीत होऊ शकतात
22 एप्रिलरोजी पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यामागील पाकिस्तानी दहशतवाद्यांपैकी हाशिम मुसा पाकिस्तानी लष्कराच्या विशेष दलाचा माजी पॅरा कमांडो असल्याचे समोर आलं आहे. केंद्र सरकारने या हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरले पाकिस्तानने कोणताही संबंध नाकारला असून भारताने लष्करी कारवाई केल्यास प्रत्युत्तर देईल असा इशारा दिला आहे. 10 दिवसांपासून नियंत्रण रेषेवर युद्धबंदीचे उल्लंघन होत आहे.