खंडणी न मिळाल्याने रसगुल्ला खाण्याची शेवटची इच्छा पूर्ण करत घेतला मित्राचा जीव

0
14

कोलकोता ः वृत्तसंस्था
गेमिंग लॅपटॉप विकत घेण्यासाठी मित्रांनीच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आधी या सगळ्यांनी आपल्या आठवीत शिकणाऱ्या मित्राचे अपहरण केले. या मित्राचे आई वडील खंडणीसाठी मागितलेले तीन लाख रुपये देऊ शकले नाहीत. त्यामुळे मित्रांनीच त्यांच्या मित्राला गळा आवळून ठार केले. त्याआधी त्याची रसगुल्ला खाण्याची शेवटची इच्छाही पूर्ण केली. ही घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे.
मित्रांना भेटायला गेलेला
मुलगा परतलाच नाही
या घटनेत ज्या मुलाचा मृत्यू झाला त्याच्या आई-वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार,मित्रांना भेटायला जातो असे सांगून मुलगा घराबाहेर पडला होता मात्र तो घरी परतलाच नाही. पश्चिम बंगालच्या नादिया या जिल्ह्यात आठवीमध्ये शिकणारा हा मुलगा आपल्या मित्रांना भेटण्यासाठी सायकल घेऊन निघाला होता मात्र तो परत आलाच नाही. कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला मात्र तो कुठेही सापडला नाही त्यामुळे या मुलाच्या घरातल्यांनी कृष्णानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला. त्यावेळी सुरुवातीला पोलिसांना वाटले की, हा मुलगा हरवला आहे मात्र त्याच्या बरोबर शाळेत शिकणाऱ्या त्याच्या मुलाला पोलिसांनी अटक केली तेव्हा सगळं सत्य समोर आले. या प्रकरणी पोलीस आणखी तिघांचा शोध घेत होते. ज्या सगळ्यांना नंतर अटक करण्यात आली.
रसगुल्ला खाऊ घालून केली हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मित्राला मारण्यापूर्वी त्याची शेवटची इच्छा विचारण्यात आली होती. या मुलाने मृत्यूपूर्वी हे सांगितले की, त्याला रसगुल्ला खायचा आहे आणि कोल्डड्रिंक प्यायचे आहे. त्यानुसार त्याची शेवटची इच्छा पूर्ण कऱण्यात आली त्यानंतर त्याची गळा दाबून हत्या करण्यात आली. या सगळ्यांनी या मुलाचा मृतदेह एका पिशवीत भरला आणि ती पिशवी एका निर्जन तलावात फेकली. पोलिसांनी शोध घेऊन हा मृतदेह ताब्यात घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here