मुंबई : प्रतिनिधी
प्रत्येक महिन्याची एक तारीख खास असते. दर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून नवीन नियम लागू होतात. बदल होणारे हे नवे नियम सामान्यांच्या खिशावर परिणाम करतात. १ ऑक्टोबर २०२३ पासूनही नवीन नियम लागू होणार आहेत. सीएनजी-पीएनजी, एलपीजी गॅसच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, आता १ ऑक्टोबरपासून वाहन परवाना, शाळेत प्रवेश घेण्यासाठी जन्मदाखला प्रमाणपत्र अनिवार्य असणार आहे. मुंबईच्या वेशीवर असणाऱ्या पाचही नाक्यांवरील टोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
एलपीजी, पीएनजी आणि सीएनजी गॅसच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील इंधन कंपन्यांकडून दर महिन्याच्या एक तारखेला गॅसच्या दरात बदल केला जातो.
मुंबईच्या वेशीवर असणाऱ्या पाचही नाक्यांवरील टोल दरामध्ये वाढ करण्यात येणार आहे. मुंबईत सायन-पनवेल महामार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग, एलबीएस मार्ग आणि ऐरोली उड्डाणपूल कॉरिडोअर या पाच एन्ट्री पॉईंटवर टोल वसूल केला जातो. कारसाठी पाच रुपये तर मिनीबस १० रुपये, ट्रक आणि बससाठी २० रुपये अतिरिक्त आकारले जाणार आहेत.
अल्प बचत योजनेच्या विद्यमान ग्राहकांना आपली खाती आधारशी लिंक करावी लागणार आहेत. ज्येष्ठ नागरिक बचत योजना सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र किंवा पोस्ट ऑफिस प्लॅन यासारख्या लहान बचत योजना सुरू ठेवण्यासाठी आधार क्रमांक प्रदान करणे आवश्यक आहे. अन्यथा १ ऑक्टोबरपासून तुमचे खाते गोठवले जाईल.
जन्म प्रमाणपत्र आवश्यक
आता जन्म प्रमाणपत्र हे अनेक गोष्टी सिद्ध करण्यासाठी एकच कागदपत्र असणार आहे. नवीन नियमांनुसार जन्म-मृत्यूची नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. जन्म आणि मृत्यू नोंदणी (सुधारणा) कायदा, २०२३ हा १ ऑक्टोबरपासून लागू होत आहे. या नियमानुसार जन्म-मृत्यूची नोंदणी करणे बंधनकारक होणार आहे. गृह मंत्रालयाने १३ सप्टेंबर रोजी याबाबत अधिसूचना जारी केली होती. शाळांमध्ये प्रवेश, वाहन चालविण्याचा परवाना जारी करणे, मतदार यादी तयार करणे, विवाह नोंदणी, सरकारी नोकरी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पासपोर्ट जारी करणे आणि आधार क्रमांक यासह विविध प्रक्रियेसाठी हे प्रमाणपत्र महत्त्वाचे असणार आहे.