जळगाव : प्रतिनिधी
मागील महिन्यात 0 ते 6 वर्षे वयोगटातील 1832 मुले तीव्र कुपोषित होती. अंगणवाडी सेविका, आंगणवाडी मदतनीस, आशा वर्कर्स, सार्वजनिक आरोग्य आणि महिला व बालकल्याण विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सांघिक प्रयत्नांमुळे एका महिन्यातच गंभीर कुपोषित बालकांची संख्या 1422 पर्यंत कमी झाली आहे. जळगाव जिल्ह्याची वाटचाल कुपोषणमुक्ती कडे सुरू झाली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या उपाययोजनांविषयी माहिती देतांना आयुष प्रसाद म्हणाले की, कुपोषणमुक्तीसाठी जिल्ह्याने मेडीकल, सर्जीकल ॲण्ड डायर्टी तीन प्रकारच्या संकल्पना वापरल्या. यामध्ये मुलांना एनर्जी नेस्ट न्यूर्टीशन फूड,2200 अंगणवाड्यांमध्ये ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात आली. पोषण पुनर्वसन केंद्रात बालकांच्या प्रवेशाचे प्रमाण वाढविले. हृदयात छेद असलेल्या मुलांच्या शोधासाठी मोहीम राबविली. त्यामुळे शस्त्रक्रियेचे प्रमाण वाढले. लसीकरण व औषध वाटपावर भर देण्यात आला.
सप्टेंबर 2023 महिन्यात भारत सरकारच्या सूचनेनुसार पोषण माह मोहीम राबविण्यात आली. पोषण माहात जळगाव जिल्ह्यातील 32 लाख लोकांपर्यंत आम्ही पोहचलो. यामध्ये जेवण कसे तयार करायचे, रानभाजीचा वापर कसा करायचा, उपलब्ध संसाधनांचा वापर कसा करायचा याबाबत जनजागृती करण्यात आली.
अतितीव्र कुपोषित बालकांची संख्या 410 ने कमी झाली आहे. तर मॅम (मध्यम कुपोषित) बालकांची संख्या सुमारे आठशेने कमी झाली आहे. म्हणजे एक हजारापेक्षा जास्त मुलांच्या आरोग्यात सुधारणा झाली आहे. इतर मुलांच्या ही आरोग्यात सुधारणा झाली आहे मात्र ते अद्याप कुपोषणाच्या बाहेर निघालेले नाहीत. हे बालक ही लवकरच कुपोषण मुक्त होतील. त्यामुळे पुढील सहा महिन्यांत जळगाव जिल्हा कुपोषण मुक्त निश्चित होणार असल्याची आशा जिल्हाधिकारी श्री.प्रसाद यांनी व्यक्त केली आहे.