रावेर पोलिस ठाण्यातर्फे इफ्तार पार्टी
रावेर (प्रतिनिधी )-
रावेर पोलिस स्टेशनतर्फे सामाजिक ऐक्याच्या उद्देशाने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. शहीद अब्दुल हमीद (नागझिरी) चौकात पार पडलेल्या या कार्यक्रमाला शहरातील विविध सामाजिक, राजकीय आणि धार्मिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरात सामाजिक ऐक्य टिकवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जाते, त्याच्या प्रभावाला बळी न पडता कायद्याच्या चौकटीत राहून शांतता जपली पाहिजे. युवकांनी नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी सौहार्दासाठी एकोप्याने राहावे, असे आवाहन अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांनी केले.
अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी कृष्णात पिंगळे होते, प्रमुख उपस्थितींमध्ये पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, सहायक पोलिस निरीक्षक अंकुश जाधव, पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, माजी नगराध्यक्ष हरिष गनवानी, डॉ. संदीप पाटील, महेमुद शेख, अशोक शिंदे, नितिन पाटील, अरुण शिंदे, संतोष पाटील, माजी नगरसेवक आसिफ मेंबर, मौलाना नजर अहमद, मौलाना शकील खान, गयासुद्दीन काझी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
अप्पर पोलिस अधीक्षक नखाते म्हणाले की, सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येऊन शहराच्या शांततेसाठी योगदान दिले पाहिजे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवणारा हा उपक्रम शहराच्या सलोख्यासाठी सकारात्मक पाऊल ठरला.