एकनाथ शिंदेंच्या दप्तरी बेपत्ता नोंद झालेले
पाकिस्तानी नागरिक फडणवीसांना सापडले!
मुबई (प्रतिनिधी )-
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीच्या सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे. महाराष्ट्रातील १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. तर, राज्यात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी एकही जण बेपत्ता नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. सर्व पाकिस्तानी उद्या सकाळपर्यंत राज्य सोडून निघन जातील, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे की पाकिस्तानी नागरिकांनी हा देश सोडून निघून जावं. हे प्रत्येक भारतीयांच्या मनातलं फर्मान आहे. महाराष्ट्रातही काही पाकिस्तानी नागरिक होते. त्यापैकी १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे. माझं त्यांना सांगणं आहे की तुम्ही जिथे कुठे असाल तिथून चालते व्हा. अन्यथा पोलीस तुम्हाला शोधतील आणि जागेवरच ठोकतील. कारण लोकांच्या मनात चीड आणणारी घटना घडली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचा दावा खोडून काढला आहे. फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता फडणवीस म्हणाले, “१०७ नागरिक हरवल्याचं बोललं जात आहे. मात्र, एकही पाकिस्तानी नागरिक हरवलेला नाही.”
मुख्यमंत्री म्हणाले, जेवढे पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात आले होते ते सगळे सापडले आहेत सगळे आता देशाबाहेर चालले आहेत. या सर्वांची स्वगृही परत पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एकही पाकिस्तानी नागरिक राज्यात राहणार नाही. माझा अंदाज आहे की उद्या सकाळपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल. त्यानंतर एकही पाकिस्तानी राज्यात दिसणार नाही.