मुंबई : प्रतिनिधी
लोकसभेची सेमीफायनल महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या तीन राज्यात प्रामुख्याने लढली गेली. त्यामुळे या राज्यातील निकालांचा महाराष्ट्रावर अप्रत्यक्ष राजकीय परिणाम नक्कीच होऊ शकतो. महाराष्ट्रातील सीमेवरील मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणाच्या जिल्ह्यांचा विचार केला, तर सीमावर्ती जिल्ह्यांमधील ६९ जागांपैकी भाजपपेक्षा काँग्रेसच वरचढ ठरली आहे. ६९ जागांपैकी ३४ जागांवर काँग्रेस तर ३१ जागांवर भाजपला विजय मिळाला आहे. तसेच तेलंगाना आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील ४ जागांवर भारत राष्ट्र समितीचे उमेदवार विजयी झाले आहे.
लोकसभेची सेमीफायनल ही एकदंरीतरित्या भाजपला प्रचंड यश देणारी ठरली आहे. विशेष म्हणजे निवडणुक असलेल्या पाच पैकी मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा ही तिनही राज्य महाराष्ट्राच्या शेजारची असल्याने या निवडणूक निकालांचे महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होतील हे नाकारता येणार नाही. त्याच त्याच दृष्टीने महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील निकालांची स्थिती आहे, याचेही दुसऱ्या बाजूने विश्लेषण केले जात आहे.
महाराष्ट्र – मध्यप्रदेश सीमेवरील निकालांची स्थिती काय ?
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील आठ जिल्ह्यात एकूण ३८ विधानसभा क्षेत्र होते. त्यापैकी १८ जागा काँग्रेसकडे तर २० जागा भाजपकडे गेल्या आहेत. त्यामुळे मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला असला तरी सीमावर्ती भागात काँग्रेसने भाजपला चांगली झुंज दिली आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरील जिल्ह्यांमध्ये काँग्रेसला जे यश मिळाले ते काँग्रेस नेते कमलनाथ यांच्या छिंदवाडा जिल्ह्यातून मिळाले आहे. छिंदवाडा जिल्ह्यातील सातही जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. बैतूल, खंडवा, बुराहनपूर या जिल्ह्यांमध्ये भाजपला एकहाती यश मिळाले आहे. तसेच खरगोन, सिवनी, बालाघाट आणि बडवाणी या जिल्ह्यात दोन्ही पक्षांना संमिश्र यश मिळाले आहे. मध्यप्रदेशाच्या सीमावर्ती भागात भाजपच्या अनेक दिगज्जना काँग्रेसने पराभूत केल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
छत्तीसगड सीमेवर निकालांची स्थिती काय?
मध्यप्रदेशासारखेच छत्तीसगडमध्येही सीमेवरील मतदारसंघात भाजपच्या तुलनेत काँग्रेसचे यश जास्त प्रभावी ठरले आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर राजनांदगाव, कांकेर, नारायणपूर आणि बिजापूर या चार जिल्ह्यांमधील १२ विधानसभा मतदारसंघात निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये १२ पैकी ८ जागांवर विजय मिळवत काँग्रेसच वरचढ ठरली आहे. त्याचप्रमाणे ४ जागांवर भाजपला विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे छत्तीसगड भाजपचे दिग्गज नेते रमण सिंह यांच्या राजनांदगाव जिल्ह्यामध्ये काँग्रेसने मोठा विजय मिळाला आहे. तिथे ७ पैकी ६ जागांवर काँग्रेसला यश मिळाले. सीमावर्ती भागातील कांकेर, नारायणपूर आणि बिजापूर या आदिवासी जिल्ह्यात भाजपने यश मिळवलय.
तेलंगणा सीमेवरील स्थिती काय?
महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरील जिल्ह्यातील १९ विधानसभा मतदारसंघापैकी ८ मतदारसंघात काँग्रेस, ७ मतदारसंघात भाजप तर ४ ठिकाणी बीआरएस ने विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे तेलंगणामध्ये भाजपने एकूण आठ जागांवर विजय मिळवला आहे. त्यापैकी सात जागा महाराष्ट्रातील सीमेवरील जिल्ह्यांमध्येच भाजपच्या झोळीत पडल्या आहे.
लोकसभेच्या जागा वाटपावर परिणाम
दरम्यान, लोकसभेचे सेमीफायनल मानल्या गेलेल्या या निवडणुकीनंतर महाराष्ट्राचा राजकारणात आणखी एक परिणाम होईल आणि तो म्हणजे महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा आणखी घट्ट होण्याची शक्यता आहे. पण दोन राज्यांमध्ये सत्ता गमावणाऱ्या काँग्रेस आघाडीमधील जागा वाटपातील वरचश्मा या निकालामुळे कायम राहणार नसल्याच्या चर्चा सध्या आहे. त्यातच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा जास्त जागांसाठीचा काँग्रेस वरील दबाव वाढेल अशी दाट शक्यता देखील आहे.