आ. खडसेंकडून मंत्री देसाईंचे संतापात अभिनंदन!
जळगाव (प्रतिनिधी)-
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानपरिषदेत एकनाथ खडसे चांगलेच संतापलेले दिसले. राज्यात इतर महत्त्वाचे प्रश्न असताना औरंगजेब आणि कामराची चर्चा झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यात ४२ मंत्री असतानाही सभागृहात केवळ एकच मंत्री सहभागी असल्यानेही संताप व्यक्त करत उपस्थित एकटेच मंत्री शंभुराज देसाई यांचे खडसेंनी अभिनंदन केले !.
अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेसाठी सभागृहात जास्तीत जास्त मंत्र्यांनी उपस्थित राहावे, ही अपेक्षा असते, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.
मला माहिती आहे, तुम्हाला खूप काम असते. रात्री जागरणं होतात. त्यामुळे सकाळी उठायला वेळ होतो, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले. त्यावर शंभुराज देसाई यांनी मी अधिकाऱ्यांकडून ब्रिफिंग घेत होतो, मी पोहोचलोच होतो पण लिफ्ट यायला वेळ गेला, असे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यावर एकनाथ खडसे उसळून म्हणाले की, तुम्हाला ब्रिफिंग घ्यायचं असतं, मग आम्हाला कामं नसतात का? ब्रिफिंग रात्री घ्यायचे. मी पण 15 वर्षे मंत्री राहिलो आहे. कामकाज मलाही माहिती आहे. आम्हाला काही कळत नाही का?, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.
राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. घोटाळे थांबलेले नाहीत. हे घोटाळ्यांचं सरकार आहे. अधिकारी मुजोर झाले आहेत. राजकीय संरक्षण मिळत असल्यामुळे झालं आहे. जळगाव जिल्ह्यातील पीडब्ल्यूडीला सोनवणे नावाचा अधिकारी आहे. तो सरकारचा इतका लाडका आहे की त्याच्या भ्रष्टाचार विषयाबाबत मी दीड वर्ष बोलत आहे. मागच्या काळात रविंद्र चव्हाण मंत्री असताना म्हणाले होते की, त्याला निलंबित करतो. परंतु काहीच केलं नाही. त्याच्यावर 9 चौकश्या सुरू आहेत. अधिवेशनाचा पूर्ण वेळ केवळ फालतू गेला. मस्साजोग , मुंडे राजीनामा, कुणाल कामरा, औरंगजेब असे विषय झाले. इथ शेतकऱ्यांच्या विषयांची चर्चा व्हायला पाहिजे होती. अॅकेडमिक चर्चा होण गरजेचे होतं, मात्र ते झालं नाही. राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.
पाटबंधारेमध्ये मोठा भ्रष्टाचार आहे. हजार हजार कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे. पाईपलाइन टेंडर काढलं 1800 कोटी रुपयांचे टेंडर काढले निवडणुक काळात ही सगळी टेंडर काढण्यात आली. 25 हजार कोटीची इरिगेशन विभागाने टेंडर काढली. ही का काढली याच उत्तर द्या, असा सवाल एकनाथ खडसे यांनी विचारला.