नवी दिल्ली : गेल्या सुमारे आठ वर्षांपासून देशात सत्तेवर असलेल्या मोदी सरकारविरोधात मागच्या काही दिवसांपासून नाराजी वाढली आहे, असा विरोधी पक्षांचा प्रचार आहे. यासाठी शेतकरी आंदोलन, वाढती महागाई आणि बेरोजगारी, तसेच कोरोनाचे संकट सांगितले जातात. मात्र एका जनमत चाचणीत पंतप्रधान म्हणून मोदींना अजूनही ५३ टक्के लोकांचा पाठिंबा आहे आणि आज लोकसभेची निवडणूक झाली तर रालोआला २९६ जागा मिळतील, असा कौल मिळाला.
इंडिया टुडे आणि सी वोटरने ही जनमत चाचणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आज देशात निवडणूक झाल्यास देशात मोदींची सत्ता कायम राहण्याची शक्यता आहे. ४०.७ टक्के मते मोदी आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला मिळतीत. तर २६.७ टक्के मते काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएला मिळतील. इतरांना ३२.७ टक्के मते मिळतील.
या मतांचे जागांमध्ये रूपांतर केल्यास रालोआला २९६ जागा मिळतील. म्हणजे पुन्हा एकदा देशात रालोआ सत्तेमध्ये येणार. काँग्रेस आणि यूपीएला १२६ मिळतील आणि इतर पक्षांना १२० जागा मिळू शकतात. विधानसभेच्या निवडणुकीमुळे सध्या देशातील राजकारणात चर्चेत असलेल्या उत्तरप्रदेशमधील मतदारांचा लोकसभेबाबतचा कलही भाजपाच्याच बाजूने आहे. लोकसभेची निवडणूक झाल्यास उत्तरप्रदेशमधील ८० पैकी ६७ जागा भाजपा जिंकेल. १० जागा सपाच्या खात्यात जातील. बसपाला दोन आणि काँग्रेसला फक्त एक जागा मिळेल.
पंतप्रधान म्हणून मोदीच…
पंतप्रधान म्हणून ५३ टक्के लोकांना पुन्हा नरेंद्र मोदीच हवेत. केवळ ७ टक्के लोकांनी राहुल गांधींना पाठिंबा दिला तर ६ टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ आणि ४ टक्के लोकांनी अमित शहा यांच्या नावाला पसंती दिली आहे.
