जळगाव : प्रतिनिधी
शहरात मोबाईल चोरणारी टोळी सक्रीय झाली असून मोबाईल चोरीच्या घटना सातत्याने वाढत आहेत मात्र पोलीस यंत्रणा अजूनही ढिम्म असल्याचे चित्र दिसत आहे.
मू.जे. महाविद्यालयाच्या पाठीमागे पायी जाणार्या विद्यार्थ्यांच्या हातातून दोन चोरट्यांनी दुचाकीवर येऊन मोबाईल लांबविल्याची घटना काल सायंकाळी घडली. दुसर्या घटनेत काव्यरत्नावली चौक ते आकाशवाणी दरम्यान शतपावली करणार्या विवाहितेच्या हातातून दोन चोरट्यांनी दुचाकीवर येऊन मोबाईल बळजबरीने हिसकावून पळ काढला. रामानंदनगर पोलिस स्टेशनला दोन्ही घटनांची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मानव छोटुलाला पाटील (वय १८) रा. गुलमोहर कॉलनी जळगाव हा बारावीचा विद्यार्थी काल सायंकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान मू.जे. महाविद्यालयाच्या पाठीमागे गणपती मंदिराजवळ लहान भावासोबत पायी जात होता. त्यावेळी दुचाकीवर दोन जणांनी येऊन मानव पाटील यांच्या भावाच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला. दोघा भावंडांनी त्यांचा पाठलाग केला परंतु ते भामटे दुचाकीवर पळून गेले. या प्रकरणी मानव पाटील यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलिस स्टेशनला दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहा. पोलिस निरीक्षक संदीप परदेशी करीत आहे.
दुसर्या घटनेत विजया सुनिल पवार (वय ३६) रा. शिवाजीनगर हुडको ह्या कामाच्या निमित्ताने काव्य रत्नावली चौकात आल्या होत्या. काव्यरत्नावली चौक ते आकाशवाणी चौक दरम्यान अॅक्सीस बॅकेजवळून पायी जात असतांना २० ते २५ वयोगटातील अज्ञात दोन भामटे दुचाकीवर येऊन विवाहितेच्या हातातून मोबाईल हिसकावून पळून गेले. महिलेने आरडाओरड केली मात्र तोपर्यत दोघे पसार झाले होते. विजया पवार यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस स्टेशनला अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार गोपाळ चौधरी करीत आहेत.
या घटनांच्या आदल्यादिवशी देखील एका वृध्दाचा मोबाईल लांबवल्याची घटना घडली आहे.रस्त्याने शतपावली करणार्या,समतानगर परिसरात राहणार्या राजेश भगवान सोनार यांच्या हातातून मोबाईल हिसकावून भामटे पसार झाले.विशेष म्हणजे या तिन्ही घटना रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीत घडल्या आहेत.