साईमत जळगाव प्रतिनिधी
शहरातून जाणाऱ्या महामार्गावर वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे रस्ते सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नगरसेविका जयश्री राहुल पाटील यांनी केली आहे. नॅशनल हायवे प्रकल्प अधिकाऱ्यांना गुरुवार, १६ एप्रिल रोजी निवेदन देत त्यांनी संबंधित ठिकाणी रिफ्लेक्टर व दिशा दर्शक फलक बसविण्याची मागणी केली.
निवेदनात नमूद केल्यानुसार, मानराज पार्क स्टॉप ते खोटेनगर दरम्यान असलेल्या पूल व सर्व्हिस रोडच्या कडेला वाहनांची अनियमित पार्किंग होत असल्याने अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच मानराज पार्क स्टॉप ते शिव कॉलनी स्टॉप दरम्यान रेल्वे पुलाजवळही अशीच परिस्थिती निर्माण झाली असून, येथे तातडीने रिफ्लेक्टर आणि दिशा दर्शक फलक बसविण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.
दरम्यान, रिफ्लेक्टरच्या अभावामुळेच ३ एप्रिल रोजी रात्री मानराज ते खोटेनगर दरम्यान अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. पावसामुळे बॅरिअर्सची अवस्था खराब झाली असून, रस्त्यावर अंधार पसरल्याने भरधाव वेगाने येणाऱ्या कारने (क्रमांक MH-19 CB-0792) कडेला असलेल्या बॅरिअरला जोरदार धडक दिली. या अपघातात कारच्या बाजूच्या काचा व बॉडीचे मोठे नुकसान झाले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
महामार्ग सुस्थितीत असला तरी सुरक्षाविषयक आवश्यक उपाययोजनांचा अभाव असल्यामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने रिफ्लेक्टर, दिशा फलक आणि आवश्यक सुरक्षा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
या पार्श्वभूमीवर नगरसेविका जयश्री पाटील यांच्या मागणीला स्थानिक पातळीवरही पाठिंबा मिळत असून, महामार्ग सुरक्षा उपाययोजना लवकरात लवकर राबवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
