अंजनेरीत साडेबारा एकरमध्ये ३ वर्षांत साकारणार पासग विहार ध्यान केंद्र
नाशिक ( प्रतिनिधी ) –
आत्मा ते परमात्मा या अंतर्मुखतेच्या प्रवासात ‘ध्यान’, ‘मौन’ आणि ‘आत्मचिंतना’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या आत्मिक साधनेचा अनुभव सखोल व प्रभावी व्हावा यासाठी नाशिक जवळील अंजनेरी येथे पासग विहार फाउंडेशनतर्फे ध्यान केंद्र उभारले जात आहे.
पौराणिक काळापासून अंजनेरीला ध्यानासाठी महत्त्व प्राप्त झाले आहे. हनुमानांच्या जन्मापूर्वी त्यांच्या माता अंजनी यांनी याच स्थळी तपश्चर्या केली होती. अंजनेरीच्या डोंगररांगांमध्ये प्राचीन गुहा असून, त्या ध्यानधारणेची साक्ष देतात. येथील एका गुहेमध्ये अडीच लाख वर्षे जुनी भगवान शांतिनाथांची मूर्ती आजही अस्तित्वात आहे. या ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक वारशामुळे अंजनेरीची निवड ध्यान केंद्रासाठी करण्यात आली आहे.
केंद्राच्या उभारणीत पर्यावरणस्नेही दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे. सौरऊर्जा, पर्जन्य जलसंचयन, नैसर्गिक बांधकाम साहित्याचा वापर आणि पर्यावरण संवर्धन यावर भर दिला जात आहे.या ध्यान केंद्रात ध्यानासाठी स्वतंत्र कक्ष, निवासासाठी खोल्या, कलादालन, ऑडिटोरियम अशा आधुनिक सुविधा असणार आहेत. हा प्रकल्प वास्तुविशारद शैलेश देवी यांच्या मार्गदर्शनाखाली डिझाइन करण्यात आला असून, पुढील ३६ महिन्यांत तो पूर्णत्वास जाणार आहे.