२९ गावांमध्ये अतिवृष्टीचे पंचनामेच नाहीत
शेतकरी प्रांताधिकारी कार्यालयावर धडकले
अमळनेर (प्रतिनिधी) –
तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले पीक नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देणे आवश्यक आहे. मात्र, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे २९ गावांमध्ये पंचनामेच झाले नाहीत. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयावर धडक देत निषेध केला.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. सोयाबीन, कापूस, मका, ज्वारीसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. मात्र, काही गावांमध्ये ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी विभागाचे कर्मचारी यांनी पंचनामे केलेच नाहीत. यामुळे शेतकरी भरपाईपासून वंचित आहेत.
शेतकरी संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना मोठ्या संख्येने शेतकरी हजर होते. शेतकरी संघटनेचे पदाधिकारी म्हणाले, “आम्ही प्रशासनाला वेळोवेळी कळवले तरीही पंचनामे करण्यात आले नाहीत. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची कार्यवाही झाली नाही, तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल.” शासनाच्या योजना असल्या तरी अंमलात आणल्या गेल्या नाहीत, तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.