नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मुंबई इंडियन्सचा २०२४ साठी कॅप्टन आता कोण असणार हे आता ठरले आहे. मुंबई इंडियन्सने आज एक पत्रक जाहीर केले आणि त्यामध्ये आपल्या संघाचा आगामी कर्णधार कोण असणार, याची माहिती दिली आहे.
मुंंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा आपल्या संंघात स्थान दिले होते पण त्यावेळी रोहित शर्मा हा मुंंबईचा कर्णधार कायम असेल, असे सर्वांना वाटत होते पण त्यानंतर मात्र बऱ्याच गोष्टींची चर्चा सुरु होती.ही चर्चा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाबाबत होती पण आज अखेर मुंबई इंडियन्सने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
मुंबई इंडियन्सने आज एक पत्रक जाहीर केले. या पत्रकात हार्दिक पंड्या हा मुंबईचा कर्णधार असेल,असे त्यांनी स्पष्ट केले आहे. हार्दिक सध्याच्या घडीला दुखापतग्रस्त आहे आणि तो अजून काही महिने क्रिकेट खेळ शकणार नाही. पण तरीही मुंबई इंडियन्सने लिलावापूर्वी आपला कर्णधार कोण असणार हे त्यांना जाहीर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला गेल्या काही वर्षांत जेतेपद पटकावता आले नव्हते.दुसरी गोष्ट म्हणजे हार्दिक हा भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे त्याला हे कर्णधारपद दिले असावे, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.हार्दिकला जेव्हा संघात स्थान दिले तेव्हाच मुंबई इंडियन्सने त्याला आपण कर्णधार करणार असल्याचे सांगितले होते, असे म्हटले जात आहे. त्यामुळे अंबानी यांनी आपला शब्द खरा केला, असे आता म्हटले जात आहे पण हार्दिक नेमका कधी मैदानात येणार, हे अद्याप समजलेले नाही. पण तो आयपीएलमध्ये नक्कीच खेळू शकतो, असे आता समोर येत आहे. त्यामुळे या आयपीएलमध्ये आता हार्दिक मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे.