महिन्याचे बजेट वाढणार, फोडणी महागणार

0
13

मुंबई : प्रतिनिधी

जीवनावश्यक वस्तुंच्या किमती एकीकडे गगनाला भिडत असताना दुसरीकडे बेरोजगारांची संख्या वाढत आहे त्यात यावर्षी महागाईने जनता होरपळून निघत आहे कारण, टोमॅटो दिडशे ते दोनशे रुपये किलोने विकला जात होता.त्यापाठोपाठ कोथिंबीर, मेथीची जुडी चाळीस ते पन्नास रुपयांना विकली गेली आणि त्यानंतर विविध भाजीपाला तसेच कडधान्यांच्या किमती देखील गगनाला भिडल्या. त्यामुळे सर्वसामान्यांचे आणि गृहिणींचे बजेट कोलमडलेले पाहायला मिळाले. मात्र, आता टोमॅटो पाठोपाठच कांदा देखील सर्वसामान्यांच्या डोळ्याला पाणी आणणार असल्याचे पाहायला मिळत आहे.

कांद्याचा दर हा गेल्या काही महिन्यांपासून स्थिर होता मात्र, सध्या कांद्याच्या दरामध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आणि गृहिणींना पुन्हा एकदा कांदा रडवणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण, नवी मुंबईतील एपीएमसी कांदा मार्केटमध्ये दरवाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी १५ ते २० रुपये किलोनं मिळणारा कांदा आज ३० ते ३५ रुपये किलोला मिळत आहे. कांद्याच्या दरामध्ये वाढ होण्याचे कारण हे अवकाळी पाऊस असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.

बाजारामध्ये कांद्याची आवक कमी होत असल्यामुळे कांद्याच्या दरामध्ये वाढ होत असल्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कांद्याचे दर स्थिर असले तरी या आठवड्यापासून कांद्याने चांगलाच भाव खाल्लेला आहे. सर्वसामान्यांना एका किलो साठी ३० ते ३५ रुपये मोजावे लागत आहे त्यामुळे गृहिणींचे बजेट पूर्णपणे कोलमंडलेले आहे.

सध्या बाजारामध्ये टोमॅटो हा १०० ते १२० रुपये किलोने विकला जात असून आता त्या पाठोपाठ कांद्याच्या दरामध्ये देखील वाढ झालेली पाहायला मिळत आहे. टोमॅटोच्या दरामध्ये वाढ झाली त्या पाठोपाठ हिरवी मिरची, कोथिंबीर व इतरही पालेभाज्या महागल्यामुळे अनेकांच्या जीवनातील टोमॅटो, कोथिंबीर, जिरे गायब झालेले पाहायला मिळाले मात्र सध्या कांद्याच्या दरात वाढ होत असल्यामुळे सर्वसामान्यांच्या आणि गृहिणींच्या डोळ्यात येणारे पाणी आणि कांदा जेवणातून गायब होणार की काय,असेच दिसून येत आहे.

यंदा अवकाळी पावसामुळे कांद्याचा दर्जा घसरला आहे. जानेवारी- फेब्रुवारीमध्ये दाखल होणाऱ्या नवीन कांद्याच्या उत्पादनाला फटका बसला आहे.साठवणूकीचा कांद्याचा दर्जा ही घसरला आहे त्यामुळे बाजारात सध्या हलक्या प्रतिचा कांदा अधिक प्रमाणात दाखल होत आहे. परिणामी उच्चतम प्रतिच्या कांद्याला उठाव असल्याने दर वाढ होत आहे. एपीएमसी बाजारात अगोदर प्रतिकिलो १५-१८ ते रुपयांनी उपलब्ध असलेले कांदे आता २० ते २५ रुपयांनी विक्री होत आहेत. तर किरकोळ बजारात ३० ते ३५ रुपयांनी विक्री होत आहे तसेच कांद्याची साइज माल पाहूनही किंमत ठरवली जात आहे.सध्या पावसाने दांडी मारली असून पावसाळी कांद्याच्या उत्पादनाला फटका बसत आहे त्यामुळे पुढील कलावधीत ही नवीन कांद्याची उत्पादन कमी असून कांद्याचे दर आणखीन वधारण्याची शक्यता आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

अवकाळी पावसाचा फटका

यावर्षी उन्हाळी कांदा हा बऱ्याच प्रमाणात सडल्यामुळे बाजारात कमी माल येऊ लागला आहे, अवकाळी पावसाचा फटका कांद्याला मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्यात पावसाळी कांदा तयार होण्यासाठी वेळेत पाऊस न पडल्यामुळे कांदा उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. येणाऱ्या काळात देखील कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. टोमॅटो, कोथिंबीर, कडधान्य, डाळी पाठोपाठ कांद्याच्या दरातही वाढ झाल्यामुळे गृहिणींना आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here