जळगाव विभागातून उन्हाळी सुट्यांमध्ये धावणार जादा ७५९ बसफेऱ्या
जळगाव (प्रतिनिधी ) –
शाळांच्या परीक्षा संपल्या आहेत. यंदा पंधरा दिवस उशिरा शाळांना सुट्या लागल्या.हे लक्षात ठेवून एसटी महामंडळाने उन्हाळी जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे. २७ एप्रिलपासून ७५९ उन्हाळी जादा बसेसच्या फेऱ्या जळगाव विभागाकडून सुरू झाल्या आहेत.
राज्य शासनाने सर्व शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम लागू केल्याने यंदा प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या परीक्षा पंधरा दिवस लांबल्या. एसटीच्या जादा फेऱ्या २७एप्रिलपासून सुरू झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची दरवर्षी गर्दी लक्षात घेता यंदा जळगाव एसटी विभागाकडून नियोजन केले गेले असून, ११ आगारातील ७५९ बसचे फेऱ्यांचे नियोजन एसटी विभागाने केले आहे.
जळगाव शहरातून तसेच अन्य आगारातून लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमध्ये सुट्यांमध्ये वाढ केली जाणार आहे. यात नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, अकोला, अमरावती, नागपूर आदी मार्गावरील गाड्यांच्या संख्येत वाढ केली जाणार आहे.
उन्हाळ्यातील सुटीत एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दरवर्षी वाढत असते. त्यानुसार अडीच लाख किलोमीटर बसफेऱ्या धावण्याबाबत नियोजन केले जाणार आहे. दररोज साधारण २००० बसफेऱ्या धावण्याचे नियोजन एसटी विभागाचे असणार आहे. मानव मिशन अंतर्गत व अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत जिल्ह्यात अडीच हजार विद्यार्थ्यांसाठी दररोज दोनशे बस फेऱ्या धावतात. सुट्या लागल्यावर या एसटी बसेस जिल्हा अंतर्गत ज्या मार्गावर प्रवाशांची गर्दी आहे तेथे धावणार आहे.