दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या वारसांना ५० लाखांची मदत
मुंबई (प्रतिनिधी )
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहलगाम हल्ल्यात बळी गेलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. या मदतीबरोबरच राज्य सरकारने आणखी घोषणा केल्या आहेत. पीडित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकार घेणार असून भविष्यातील रोजगारासाठीही विशेष योजना आखण्यात येणार आहे.
या हल्ल्यात कुटुंबातील सदस्य गमावलेल्या आसावरी जगदाळे यांना सरकारी नोकरी देण्यात येणार आहे, असा निर्णयही मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. सरकारने केवळ आर्थिक मदतीपुरते सीमित न ठेवता, दीर्घकालीन पुनर्वसनाच्या दृष्टिकोनातून ही पावले उचलली आहेत.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या हल्ल्याने देश हादरून गेला होता. यात राज्यातील सहा जणांचा समावेश होता. राज्य सरकारने केलेली ही मदत आणि पुनर्वसन योजना सामाजिक बांधिलकीचे उदाहरण म्हणून पाहिली जात आहे. राज्य सरकारकडून पुढील काळात या कुटुंबीयांच्या गरजा लक्षात घेऊन पावले उचलली जातील.