साकीनाका प्रकरणावर राजकारण म्हणजे टाळूवरील लोणी खाणे; संजय राऊत यांचा विरोधकांवर हल्लाबोल

0
45

मुंबई: प्रतिनिधी

साकीनाका बलात्कार घटनेचा निषेध करत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करतानाच महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करत आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. यावर प्रतिक्रिया देत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे. साकीनाक्याची घटना दु्र्दैवी असून विरोधकांनी याचे राजकारण करणे थांबवले पाहिजे असे सांगतानाच या घटनेवर राजकारण करणे म्हणजे मृताच्या टाळूवरील लोणी खाण्यासारखेच आहे,असा टोला राऊत यांनी लगावला आहे. (shiv sena mp sanjay raut criticizes opposition over reactions on sakinaka rape case)

साकीनाक्यातील ही घटना अत्यंत दुर्देवी आणि धक्कादायक अशी घटना आहे. मुंबई महिलांसाठी कायम सुरक्षित असल्याची भावना कायम आहे. मुंबई हे महिलांसाठी अत्यंत सुरक्षित शहर आहे. जगभरातील सुरक्षित शहरात मुंबईचे स्थान वरचे आहे. या घटनेवरून आता गदारोळ सुरू आहे. महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला असून पोलिसांनी आरोपींना अटकही केलेली आहे, असे राऊत म्हणाले.


साकीनाका बलात्कारप्रकरणी आंदोलन करणाऱ्यांबाबत बोलताना राऊत म्हणाले की, आता काही ठिकाणी माणसे जमवण्याचे प्रकार सुरू आहेत. हे टाळणे गरजेचे असून या घटनेतील आरोपींना नक्की कठोर शासन होईल, असे राऊत म्हणाले.


पोलिसांना या पीडित महिलेचा जबाब घेता आला नाही. तिचा जबाब घेता आला असता तर अनेक गोष्टी बाहेर आल्या असत्या. तरीही पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि त्याच्या लिंकच्या माध्यमातून मुख्य आरोपीला अटक केली आहे. मात्र मी सकाळपासून पाहात आहे की विरोधी पक्षाचे नेते आणि नेत्या सरकारवर आरोप करत आहेत. त्यांनी भूमिका नक्कीच मांडली पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असतील या सर्वांनी या घटनेचा धिक्कार आणि निषेध नोंदवला आहे. आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा मिळाली पाहिजे, मग ती शिक्षा फाशीही असेल. ती होण्यासाठी सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला पाहिजे आणि मुख्यमंत्री ही मागणी मान्य करतील, असेही ते पुढे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here