लखनौ आगामी वर्षात पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका संपन्न होणार आहेत. यात उत्तर प्रदेशाचाही समावेश असून, या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष्य लागलेले असेल. विशेष म्हणजे उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत काँग्रेससह इतर पक्ष मोठ्या तयारीनिशी उतरणार आहे. आणि अशातच शिवसेनेने राज्यातील सर्वच्या सर्व ४०३ जागा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेनेची प्रांत कार्यकारिणीच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी भाजपवरही (BJP) गंभीर आरोप करण्यात आले.
या बैठकीत शिवसेनेने (Shiv Sena) आरोप केला आहे, की भाजप सरकारच्या शासन काळात राज्यातील कायदा आणि सूव्यवस्था पूर्णपणे अपयशी ठरली असून महिलाही असुरक्षित आहेत. दारुलशफा येथे झालेल्या या बैठकीत राज्याचे प्रमुख ठाकूर अनिल सिंह म्हणाले, उत्तर प्रदेशातील योगी सरकार ब्राह्मणांसोबत योग्य पद्धतीने वागत नाही. तसेच राज्यातील वैद्यकीय सुविधा आणि शिक्षण व्यवस्थेची स्थितीही अत्यंत बिकट झाली आहे. एवढेच नाही, तर बेरोजगारी आणि महागाईनेही जनता त्रस्त झाली असल्याचे ठाकूर म्हणाले.