मुंबई, वृत्तसंस्था । निर्यात क्षेत्राला चालना देण्यासाठी मुंबई येथील जागतिक व्यापार केंद्र (वर्ल्ड ट्रेड सेंटर) येथे आजपासून राज्यस्तरीय ‘वाणिज्य उत्सव’ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन आज मंगळवार, दि. 21 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खनिकर्म राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उद्योग राज्यमंत्री कुमारी अदिती तटकरे, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंग, उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदिप कांबळे उपस्थित राहणार आहेत.
“आजादी का अमृत महोत्सव”- 75 व्या स्वातंत्रदिनाच्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागामार्फत दि.20.09.2021 ते 26.09.2021 या दरम्यान “वाणिज्य सप्ताह” साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. यावेळी विविध क्षेत्रातील 200 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन उद्योग विभागाच्या संनियंत्रणाखाली DGFT या केंद्र शासनाच्या संस्थेच्या सहयोगाने व Gems and Jewellery Export Promotion Council (GJEPC) यांचे मार्फत करण्यात आले आहे. याद्वारे राज्यातील निर्यात संधी, पायाभूत सुविधा, बॅंकींग आणि वित्तीय सहकार्य, खाद्य, कापड, इंजिनिअरिंग, केमिकल आणि औषध निर्मीती, जेम्स ॲण्ड ज्वेलरी आदी याविषयावर चर्चासत्रे (Panel Discussion) तसेच प्रदर्शन दालनांमार्फत (Stalls) माहिती देण्यात येणार आहे.