राष्ट्रवादीच्या बैठकीत खडसेंनी दिला पक्षसंघटन वाढीवर जोर

0
81

जळगाव ः प्रतिनिधी

माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची पहिलीच बैठक बुधवारी दुपारी पक्ष कार्यालयात झाली. यावेळी खडसेंनी पक्षसंघटन वाढीवर जोर दिला तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष ऍड. रविंद्र पाटील यांनी केले.

माजीमंत्री गुलाबराव देवकर यांनी खडसेंमुळे पक्षसंघटन वाढणार असल्याचे नमूद केले. अल्पसंख्याक आघाडीचे गफ्फारभाई मलिक यांनी जिल्ह्यात बीएचआर प्रकरणी सुरू असलेली कारवाई म्हणजे सीडीविनाच फटाके फुटत असल्याचे म्हटले.जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ऍड. रोहिणीताई खडसे यांनी पक्षात नवीन असल्याने काही चूक झाल्यास आमचे कार्यकर्ते आणि आम्हाला सांभाळून घ्यावे असे आवाहन केले.माजी आमदार मनीष जैन यांनीही पक्षाला खडसेंमुळे चांगले दिवस येणार असल्याचे म्हटले. पणन महासंघाचे संचालक संजय पवार यांनी खडसे वर्षभर आधी पक्षात आले असते तर किमान ५ आमदार निवडून आले असते,असे सांगितले.
युवकचे जिल्हाध्यक्ष रविंद्र नाना पाटील यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी माजी आमदार दिलीप वाघ, दिलीप सोनवणे, संजय गरुड, महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कल्पनाताई पाटील, युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, प्रदेश उपाध्यक्षा विजया पाटील, मंगलाताई पाटील, तिलोत्तमा पाटील, राजेश पाटील, वाल्मीक पाटील, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे उपस्थित होते.
राज्यातील सरकार पडणार नाही याची खात्री
असल्यानेच राष्ट्रवादीमध्ये ः माजीमंत्री खडसे
राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. यातील एकही पक्ष बाहेर पडू शकत नाही. हे सरकार पूर्ण पाच वर्षे चालणार याची खात्री असल्याने मी दूरदर्शीपणा ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. सरकारबाबत आपण निश्चिंत असल्याचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत स्पष्ट केले. दरम्यान, आपले आमदार पळून जाण्याच्या भीतीने भाजपने त्यांना सत्ता येणार म्हणून चॉकलेट देण्याचा कार्यक्रम सुरू ठेवला असल्याची टीकाही त्यांनी केली.
रडणार्‍या बाळाला चॉकलेट, आईस्क्रिम सारखे आमिष दाखवावे लागतात.राजकारणात मीदेखील हे उद्योग केले आहेत. २०१४मध्ये शरद पवारांच्या मदतीने राज्यात भाजपची सत्ता आली होती. त्यावेळी ५० पदांसाठी आम्ही जवळपास २०० जणांना आश्वासने दिली होती. तशी आश्वासने आता भाजपला त्यांचे आमदार सांभाळण्यासाठी द्यावी लागत आहेत. हे सरकार ५ वर्षे पडणार नाही हे त्यांनादेखील माहिती आहे. मला दूरचं राजकारण कळत. तीन पक्षांचे सरकार भाजपला रिक्षा वाटत असेल तर अटलजींनी ३२ पक्षांच्या सरकारची मालट्रक यशस्वीपणे चालवली होती, असेही खडसे म्हणाले.‘पवार इज पॉवर’ असे म्हणत खडसेंनी शरद पवारांचा आवर्जुन उल्लेख केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here