हिंगोली ः वृत्तसंस्था
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. मोदींनी विरोधकांच्या नव्याने निर्माण झालेल्या ‘इंडिया’ आघाडीची तुलना दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिद्दीन यांच्याशी केल्यावरून उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला. तसेच असे असेल तर मोदी दक्षिण अफ्रिकेला इंडियाचे पंतप्रधान म्हणून गेेले होते की,इंडियन मुजाहिद्दीनचे प्रतिनिधी म्हणून गेेले होते असा सवाल ठाकरेंनी केला.ते रविवारी (२७ ऑगस्ट) हिंगोलीत बोलत होते.
शिवसेनेतील बंडखोरी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सक्रिय झाले आहेत. आज त्यांनी हिंगोलीत निर्धार सभा घेतली. हिंगोली हा आमदार संतोष बांगर यांचा मतदारसंघ. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर संतोष बांगर ठाकरेंच्या बाजूने होते. डोळ्यांत अश्रू आणत त्यांनी शिंदेंना माघारी बोलावले होते परंतु, आयत्या वेळेला संतोष बांगरच शिंदे गटाकडे गेले. तिकडे गेल्यावर बांगरांनी ठाकरेंवर सातत्याने टीका केली आहे.आज त्यांच्याच मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरेंनी शिंदे गट आणि भाजपावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “आम्ही ‘इंडिया’ आघाडी म्हणून एकत्र आलो तर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड घसरले. त्यांनी इंडियाचा उल्लेख घमेंंडीया करून टाकला. ते आम्हाला घमेंडीया म्हणत असले तर आम्हीही त्यांना घमेंंडीए असे म्हणतो. ते एनडीए आहेत पण घमेंडी, गर्विष्ट आहेत. आता जो एनडीए म्हणून शिल्लक राहिलाय त्याला काही आकार उकार,शेंंडा बुडखा शिल्लक राहिलेला नाही.
“अमिबा नावाचा एकपेशीय जीव पोटात गेला की पोट बिघडते. तो एकपेशीय असतो, पण त्यालाही आकार उकार काही नसते. तो कसाही वाढत असतो, तशीच स्थिती एनडीएची झाली आहे. एनडीएचा आता अमिबा झाला आहे. यांच्याबरोबर मुळात पक्ष आहेच किती.पक्ष फोडून केवळ थिगळं लावून एनडीए उभी केली जात आहे,” असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “आम्ही इंडियाचं नाव घेऊन पुढे आलो आहोत, तेव्हा ते आमची तुलना इंडियन मुजाहिद्दीनशी करतात. इथे जमलेले सगळे दहशतवादी आहेत का? माझ्या प्रेमाखातर माझे विचार ऐकायला इथे आलेले दहशतवादी आहेत का? इथे जमलेल्यांनी आपले काम करायचे थांबवले तर यांचे सरकार गडबडेल, पीक पिकणार नाही. उद्योगधंंदे चालणार नाही.असा हा घाम गाळणारा माझा शेतकरी-कामगार माझ्यासमोर बसलेला आहे. हा अतिरेकी नाही.”