महास्वच्छता अभियानात पहिल्याच दिवशी ३०८ टन कचरा संकलन

0
49

जळगाव : प्रतिनिधी
शहरात अस्वच्छतेच्या तक्रारी वाढल्याने मनपा प्रशासनाकडून महास्वच्छता अभियान हाती घेण्यात आले आहे. महास्वच्छता अभियानाच्या पहिल्याच दिवशी महापौरांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. नागरिकांना कर भरून देखिल मूलभूत सुविधा मिळत नसल्याने नागरिकांनी महापौरांसह पदाधिकार्‍यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. अभियानाच्या पहिल्या दिवशी शहरातून तब्बल ३०८ टन कचरा संकलन करण्यात आला.
शहरात साफसफाईचा बोजवारा उडाला आहे. अस्वच्छतेबाबतच्या तक्रारी वाढल्याने महापौर भारती सोनवणे यांनी महास्वच्छता अभियान हाती घेतले आहे. सोमवार दि. १८ रोजी शिवाजीनगरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभियानाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी आयुक्त सतीश कुलकर्णी, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, पाणीपुरवठा सभापती अमित काळे, नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी, चेतन सनकत, नवनाथ दारकुंडे आदी यांसह अधिकारी उपस्थित होते.
नागरिकांनी वाचला समस्यांचा पाढा
शिवाजी नगरातील नागरिकांनी शिवाजीनगर, भारतनगर, हरिओमनगर, प्रजापतनगरात गटारींची स्वच्छता नियमित होत नाही. गटारीतून काढलेली घाण २ दिवस उचलण्यात येत नसल्याची तक्रार केली. महापौरांकडे केली. नगरसेवकांच्या घरासमोर कर्मचारी दररोज सफाई करून निघून जातात, सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रारही नागरिकांनी केली.
आयुक्त कुलकर्णी यांनी केल्या सूचना
शहरातील साफसफाईसाठी ८०० कर्मचारी आहेत. दररोज १०० कर्मचारी जरी सुटीवर असले तरीही शहराची योग्यप्रकारे साफसफाई होऊ शकते. अधिकार्‍यांनी आणि आरोग्य निरीक्षकांनी आपल्या विभागातील कर्मचार्‍यांवर वचक ठेवून काम करून घेतल्यास कुणाचीही ओरड राहणार नाही, अशा सूचना आयुक्त कुलकर्णी यांनी यावेळी अधिकार्‍यांना दिल्या.
१३५ कर्मचार्‍यांना नोटीस
सोमवारपासून महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार असल्याने गैरहजर राहू नये, अशा सूचना सर्व कर्मचार्‍यांना देण्यात आल्या होत्या. सोमवारी महापालिकेच्या ४७५ कायम कर्मचार्‍यांपैकी केवळ ४०३ तर मक्तेदाराकडील ४०० पैकी ३३७ कर्मचारी हजर होते. त्यामुळे महापालिकेच्या ५४ गैरहजर कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या तर मक्तेदाराच्या ६३ गैरहजर कर्मचार्‍यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड करण्यात आला आहे.
अभियानाचा दुसरा टप्पा बुधवारी
सोमवारी राबविण्यात आलेल्या महास्वच्छता अभियानात सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत शहरातून ३०८ टन कचरा संकलित करण्यात आला. प्रभाग १ ते ६ मधून ३८ टन अतिरिक्त कचरा संकलित करण्यात आला. तब्बल सहा प्रभागात अतिरिक्त ३८ टन कचरा निघाल्याने प्रशासन आणि मक्तेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, अभियानाचा दुसरा टप्पा बुधवारी राबवण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here