जळगाव : विशेष प्रतिनिधी
सध्या जळगाव महापालिकेच्या महापौर पदाची निवडणूक गाजत आहे.तशा तर सर्वच निवडणुका गाजतात. परंतु जळगावात ही निवडणूक गाजण्यापेक्षा भाजपातील अंतर्कलह आणि फूट गाजत आहे. फक्त जळगावात हा विषय गाजत नसून सार्या महाराष्ट्रात चर्चेत आहे. त्याच महत्वाचं कारण म्हणजे हा फक्त भाजप पुरता मर्यादित विषय नाही. तर तो माजीमंत्री आ. गिरीश महाजन यांच्याशी निगडित असल्याने व त्यांच्या नाकावर टिच्चून शिवसेनेने सारा खेळ केल्याने संपूर्ण चर्चा महाजनांभोवतीच फिरते आहे.शहरात याच्या प्रतिक्रिया उत्तम उमटू लागल्या आहेत. एक सर्वसाधारण व्यक्ती की, त्याचे कोणत्याच राजकीय पक्षाशी काहीही घेणे-देणे नाही .त्या व्यक्तीने या घडामोडींवर एकच शब्द उच्चारला यह तो होना ही था !
जेव्हापासून देशात भाजप ची घौडदौड सुरू झाली असेल तेंव्हापासूनचा इतिहास तपासा. तत्कालीन जळगाव नगरपालिका असो किंवा आताची महापालिका. येथील कोणत्याच निवडणुकीत भजपाला २५ च्या वर जागा मिळालेल्या नाहीत. तत्कालीन मंत्री एकनाथ खडसे यांनी भरपूर प्रयत्न केले आहेत.त्यांनी जळगाव नगरपालिका , महापालिका ताब्यात घेण्याचा खूप प्रयत्न केला आहे.मात्र त्यांना यश मिळाले नव्हते.एकच अपवाद की, लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपच्या डॉ.के.डी. पाटील यांनी बाजी मारली होती . मात्र तेव्हाही नगरसेवकांचे बळ भाजपकडे नव्हतेच .
मग एकनाथराव खडसेंना जे जमले नाही ते जामनेरच्या गिरीश महाजन यांनी २०१९ च्या महापालिका निवडणुकीत कसे शक्य करून दाखविले ? हा प्रश्न आहे. त्या सामान्य माणसाने पत्रकारालाच हा प्रश केला, म्हणे महाजन यांनी कोणती जादू केली की ते म्हणाले त्याप्रमाणे भाजपला ५० च्या वर जागा मिळाल्या होत्या. बरोबर आहे.जेव्हा खडसे यांनी जंग-जंग पछाडले तेव्हा २० -२५ च्यावर जागा भजपाला मिळत नव्हत्या आणि महाजन यांनी हाती सूत्रे घेताच ७५ पैकी ५७ मार्क पडलेच कसे ? हा त्याच माणसाचा प्रश्न .
एकनाथराव खडसे यांचं खच्चीकरण करण्यामागे कोण आहे हे सांगण्याची गरज नाही. खडसे यांनीच याबद्दल जाहीरपणे सांगितले आहे .२०१९ च्या महापालिका निवडणुकीत ज्येष्ठ असूनही खडसे यांना विश्वासात न घेता , त्यांचे कोणतेच मार्गदर्शन न घेता निवडणुकीची सारी सूत्रे महाजन यांनी हाती घेतली होती.उमेदवारी कोणाला द्यायची (कोणाला तिकीट देऊन पडायचे) कोणाला नाकारायची हे सारे त्यांनीच ठरविले होते. त्यावेळी कदाचित त्यांना ठाऊक होते की, भजपाला यश मिळणार नाही. म्हणून त्यांनी ….तेव्हाच्या मनसे चे ललित कोल्हे यांच्यासह त्यांनी मनसे चे १२ नगरसेवक, सेनेचे चार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ८ असे एकूण २४ नगरसेवक भाजपात खेचून आणले होते. तेव्हा कुठे हे २४ मिळून भाजपने ५७ च पल्ला गाठला होता.त्यात महाजन यांचा करिष्मा वैगैरे काहीच नव्हता.पण त्यांनी ललित कोल्हे सह इतरांना फोडण्यासाठी कोणती जादू(ब्लॅकमेल) केली तेच जाणोत.पण त्यांनी त्यावेळी खडसे यांच्यावर मात केली होती हे नक्की.
एकनाथराव खडसे यांचा जेव्हा प्रचंड बोलबाला होता किंबहुना त्यांचा प्रभाव होता , त्यावेळी त्यांच्याबद्दल म्हटले जायचे की लोक त्यांना का घाबरतात तर त्यांच्याकडे अनेकांच्या फाईल्स आहेत.खडसे यांनीही तसे म्हटले होते .फक्त फाईल्स नव्हे तर सीडी पण आहे असे ते म्हणाले होते. परंतु गिरीश महाजन यांनी ललित कोल्हे सारख्या ताकदवान व्यक्तीला फोडले म्हणजे मोठीच फाईल उघडली असणार ? असो .
आता चित्र बदलले आहे . आ. गिरीश महाजन यांच्या पक्षाची सत्ता नाही . म्हणजे त्यांचा प्रभाव नाही . अर्थात ते प्रभावशाली नेते नाहीत . आणि पत्ता असा बदलला की एकनाथराव खडसे सत्ताधारी पक्षात(राष्ट्रवादी)आहेत. ते मंत्री नसेनात पण प्रभावशाली नेते जरूर ठरले आहेत. त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हा उपमहापौर असलेले भाजपचे सुनील खडके त्यांना भेटायला गेले होते. याच खडके यांनी माजीमंत्री ना.गुलाबराव देवकारांना वाढ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हाच खडके – खडसे यांच्यासोबत जाणार हे निश्चित झाले होते. खडसे यांनाही तेच हवे होते.
वास्तविक कोल्हे असोत,खडके की काळे असो यांची निष्ठा खडसे यांच्यावरच होती ,परंतु खडसे यांचा प्रभाव कमी करून महाजन प्रभावशाली झाल्याने या लोकांनामहाजनांचे नेतृत्व मान्य करावे लागले होते. आणि आता सार्यांना कळून चुकले की ते आता संकटमोचक राहिलेले नाहीत .परिणामी त्यांचे घर फुटने निश्चितच होते .
भाजपचे सभागृह नेते असलेले ललित कोल्हे यांच्यासह तब्बल २५ भाजप नगरसेवकांनी भाजपची नव्हे तर महजनांची साथ सोडली आहे .कारण आता त्यांचा प्रभाव राहिलेला नाही .जळगावात एके काळी स्व.मधुकरराव चौधरी . माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, स्व जे टी. महाजन यांचा काळ होता. नंतर सुरेश जैनांचा झंझावात झाला. त्यांनतर एकनाथराव खडसे यांचा बोलबाला, त्यांना थंड करून गिरीश महाजन यांचा सुवर्णकाळ आणि आता ….यह तो होना ही था !
राजकारणात कुणीच कुणाचा शत्रू व मित्रही नसतो असे म्हणतात. पण बदले की आग पहा. स्व,निखिल खडसे यांचा विधानपरिषदेत झालेला पराभव आणि त्यातून झालेली सुरेशदादा जैन यांची अवस्था. घरकुल प्रकरण मार्गी लावले कुणी? आणि आता ज्यांच्या पतनाला कारणीभूत असलेल्या व्यक्तीला ते मोकळे कसे सोडतील ? अजून सीडी आहे ना. मनीष जैन आणि संतोष चौधरी व अनिल चौधरी हे एकनाथराव खडसेंच्या मांडीला मांडी लावून बसतात .हे बदललेले राजकारण आहे .