…तर कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई

0
60

जळगाव : प्रतिनिधी
रस्त्यांच्या सुरु असलेल्या कामांमुळे नागरीकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्यामुळे ही कामे लवकर पूर्ण होणे आवश्यक असून कामांचा दर्जा चांगला राहील याची दक्षता विभागाने घ्यावी. तसेच जे कंत्राटदार विहित कालावधीत कामे पूर्ण करणार नाही. त्यांचेवर दंडात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या.
संसद सदस्य रस्ता सुरक्षा समितीची बैठक खासदार रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवनात नुकतीच पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना ना. पाटील यांनी, नागरीकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन चाळीसगाव येथे परिवहन विभागाचे उप कार्यालय सुरु करण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी तातडीने प्रस्ताव सादर करावा, अशा सुचना दिल्या. जिल्ह्यातील महामार्गावरील ट्रामा केअर सेंटरच्या प्रस्तावांचाही आढावा त्यांनी यावेळी घेतला. महामार्गावर प्रमुख गावांजवळ बसथांबा असावा, भविष्यातील अडचणी लक्षात घेता गिरणा नदीवरील बांभोरी पुलाला पर्यायी पुल उभारावा.
अपघाताची माहिती मिळताच तत्काळ ऍम्बुलन्स पोहोचेल याचीही काळजी घ्यावी, अशा सुचनाही त्यांनी यावेळी केल्या. बैठकीस परिवहन, एस.टी, सार्वजनिक बांधकाम विभागासह इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here