भुसावळ ः प्रतिनिधी
तळवेल येथील रहिवासी व भुसावळ शहरात वास्तव्यास असणारे आणि वरणगावमध्ये वासुदेव नेत्रालय आणि ऊँ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठित भुसावळच्या माध्यमातून भुसावळ तालुका परिक्षेत्रात जागतिक महामारी कोरोनाच्या काळात विविध सामाजिक, आरोग्य क्षेत्रात, वैद्यकीय प्रबोधन, जनजागृती क्षेत्रातील उल्लेखनीय सेवेबद्दल डॉ.नितु पाटील आणि डॉ.रेणुका पाटील यांचा मुंबई येथील राजभवनात जनराज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते गुलाबपुष्प आणि कोरोनावीर सम्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र राज्यातील आरोग्य क्षेत्रात खाजगी सेवा करणारे विविध शाखेतील सर्व डॉक्टर, फार्मासिस्ट, रेडीओ ग्राफर आदी सर्व आरोग्यसेवक यांच्या कोरोनावीर सम्मान सोहळ्यात समावेश होता. राजभवनात सर्व शासकीय नियमानुसार हा सत्कार समारोह पार पडला. जनराज्यपालांनी सर्व आरोग्य सेवकांची सेवा नसून ही एक तपश्चर्या आहे, आपल्या कार्यामुळे कोरोना संक्रमणामधून बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के पेक्षा जास्त आहे, आपल्या कार्याची दखल इतिहासात नक्कीच घेतली जाईल. आगामी काळात देखील आपली सेवा कार्य अशीच सुरू ठेवा, अश्या शब्दात सर्व कोरोना विरांचे कौतुक केले.
ऊँ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठित, भुसावळद्वारे डॉ. पाटील दाम्पत्याने कोरोना काळात कोरोना विभागात भरती झालेल्या रुग्णांचे वाढदिवस साजरे करणे, पोलिस बांधव, पोस्ट कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांनी पूर्ण हात बंद मोजे, गॉगल, प्रभू श्री रामरक्षा वाटप करणे, भुसावळ शहरात स्वच्छता किट वाटप करणे, अन्नदान करणे, सोशल मीडियावर कोरोना पुराण २०१९ याद्वारे लेखन आणि जनजागृती करणे, ग्रामीण रुग्णालयात कोरोना सेवा आणि नॉन कोरोना सेवा देण्यासाठी पाठपुरावा करणे, तपासणी अहवाल लवकर मिळण्यासाठी प्रयत्न करणे, व्यापक स्वरूपात कोरोना तपासणी शिबिर भरवण्यास ग्रामीण रुग्णालय भुसावळला मदत करणे, मृत्युमुखी झालेल्या कोरोना विरांच्या वारसांना प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत ५० लाख विमा साठी आवेदन पत्र भरण्यासाठी मदत करणे, शासन स्तरावर त्याचा पाठपुरावा करणे, विभागातील सर्व कंत्राटी कोरोना योद्धांचे प्रश्न शासन दरबारी मांडणे आदी विविध सामाजिक, आरोग्य आणि जनहितार्थ उपक्रम राबविले आहेत.
आता महाराष्ट्र राज्याच्या संवैधानिक पदावरील जनराज्यपाल यांच्याकडून डॉ.पाटील दाम्पत्याच्या कार्याची दखल आणि यथोचित सत्कार झाल्याने समाजातील विविध स्तरामधील जनतेकडून डॉ. परिवाराचे कौतुक होत आहे.
महाराष्ट्र शासनाने आम्ही केलेल्या कार्याची घेतलेली दखल आणि सत्कार निश्चितच अक्षय ऊर्जा आणि सोबत सामाजिक जबाबदारी वाढल्याचे वास्तव जाणीव करून देणारा आहे. आमचा हा पुरस्कार आम्ही कोरोना रुग्णांची सेवा करण्यार्या सर्व शहीद कोरोना वीरांना समर्पित करत आहोत.
– डॉ.नि.तु.पाटील
अध्यक्ष, ऊँ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठित,भुसावळ