जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त उर्वेश साळुंखेंकडून जनजागृती

0
10

जळगाव : प्रतिनिधी
३१ मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.तंंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून लोकांंना रोखण्याचा हा दिवस या निमित्ताने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थामुळे होणार्‍या जीवघेण्या परिणामांची माहिती देत बुधगाव येथे राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष उर्वेश साळुंखेंने जनजागृती केली.
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे लोक आपल्या आजूबाजूला सर्वत्र दिसून येतात. घर, कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारी व धुम्रपान करणारी मंडळींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.
तंबाखू सेवन व्याप्ती आणि परिणाम
तंबाखू सेवनाने भारतात साधारणत: १० लाख लोक मृत्यू पावत असल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्रात साधारणत: ३६ टक्के पुरुष व ५ टक्के महिला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. तंबाखूमुळे हृदयरोग, कर्करोग, यकृताचा आजार, फुफ्फुसाचे आजार व क्षयरोग यासारख्या प्राणघातक आजारांना बळी पडतात तसेच लकवा, मोतीबिंदू, नपुंसकत्व व कमी वजनाचे व्यंग असलेले-मृत्यू पावलेले बाळ जन्माला येणे यासारख्या व्याधी जडण्याचे प्रमाणही वाढत आहे.तंबाखु सेवनामुळे अकाली मृत्यूचे प्रमाणही वाढलेले आहे.सर्वदुर बिडी, गुटखा, तंबाखू, सिगारेट, मावा, खैनी, तपकीर व चिलम यासारख्या तंबाखूच्या पदार्थांचे व्यसन मोठ्या प्रमाणात केले जाते.हे व्यसन करु़ नये असे राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष उर्वेश साळुंखेनी गावातील लोकांना ह्या दिनानिमित्त सांगितले.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम
केंद्र आणि राज्य सरकारच्या सहयोगाने राज्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. व्यसनाधीन वयस्कर व मुले व्यसनाला बळी पडल्यामुळे त्यांचा अकाली मृत्यू होत आहे.तंबाखु व्यसनाचे प्रमाण कमी व्हावेत यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. जनजागृतीमुळे या व्यसनाचे गंभीर परिणामही जनतेपर्यंत पोहोचवले जात आहेत. या कायद्याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदी, १८ वर्षाखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकणे वा विकायला लावण्यास प्रतिबंध, तंबाखूचा प्रसार, जाहिरात व प्रायोजकत्व यावर बंदी, शैक्षणिक संस्थेचा १०० यार्ड परिसरात तंबाखू विक्रीवर बंदी,तंबाखू उत्पादनावर धोक्याच्या सुचना देणे याचा अंतर्भाव होतो. शासकीय कार्यालयात व परिसरात या पदार्थांच्या सेवनावर कडक बंदी असून अशा लोकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार कायद्याने अधिकार्‍यांना दिले आहेत.
शालेय मुलांमध्येही तंबाखू व्यसनाचे वाढते प्रमाण आज सर्वांत मोठी चिंतेची बाब आहे. लहान मुलांमधील व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. पालकांनी मुलांसमोर स्वत: व्यसन न करता व्यसनापासून परावृत्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.कारण ज्येष्ठांचेच अनुकरण लहान मुले करतात व परिणामी वाढत्या वयात मुले व्यसनाधीन होतात.त्यामुळे व्यसनापासून मुक्तता ही योग्य वयातच झाली पाहिजे. व्यसनापासून परावृत्त होण्यासाठी व्यायाम, प्राणायाम, योगासने व आवडीचा छंद जोपासून त्यात रमणे , व्यसनाधीन संगतीपासून लांब राहणे, वैद्यकीय मदत घेणे यासारखे उपाय करता येतील.व्यसनमुक्तीकडे सुरु असलेल्या प्रक्रियेमध्ये समाजातील सर्व स्तरावरील घटकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे.
आपल्या आजूबाजूला व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनाचे दुष्परिणाम समजावून त्यांना व्यसनापासून परावृत्त करणे ही आपल्या सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे. आपण सर्वजण मिळून जर या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाला विरोध केला तर नक्कीच भारतीय नागरिकांचे आरोग्य स्वस्थ व सुदृढ होण्यास मदत होईल अशी अपेक्षा साळुंखे यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here