जळगाव ः विशेष प्रतिनिधी
सध्या जळगाव शहरात महामार्गावर नव्याने उभारण्यात आलेल्या सर्कलचे नामांतर करण्याची चढाओढ चालली आहे. राजकीय पदाधिकारी,नेते मंडळी ,स्थानिक नगरसेवक त्यासाठी चक्क रस्त्यावर उतरले आहेत आणि दुसरीकडे महापालिकेने शहरातील मालमत्तांचे फेरमूल्यांकन करून मालमत्ताधारकांना कित्येक पटींनी घरपट्टी वाढीच्या नोटिसा पाठविल्या आहेत.त्यास सर्वच मालमत्ताधारकांचा प्रचंड विरोध आहे मात्र याप्रश्नी कोणत्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी आवाज उठविलेला नाही.एकटे ललित कोल्हे सोडले तर नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या या प्रश्नावर कोणत्याच सत्ताधारी व विरोधी नगरसेवकाने तोंड उघडलेले नाही त्यामुळे स्थनिक लोकप्रतिनिधी बद्दल जळगावकर नागरिक तीव्र संताप व्यक्त करू लागले आहेत.
सध्या जळगाव शहरातील नव्याने तयार करण्यात येत असलेल्या चौपदरी महामार्गावरील चौकातील सर्कलचे नामकरण करण्याची विविध राजकीय पक्ष व संघटनेत चढाओढ सुरू आहे.कोणत्या चौकाला व सर्कलला कोणाचे नाव द्यावे व देऊ नये यावरून वाद सुरू झाला आहे.वास्तविक जळगावकर नागरिक आज महापालिकेकडून दिल्या गेलेल्या घरपट्टी वाढीच्या नोटिसांनी त्रस्त झाले आहेत.महापालिकेने मालमत्तांचे फेर मूल्यांकन करण्याच्या कामी गेल्या वर्षी अमरावती येथील मक्तेदाराला काम सोपविले होते व त्याच्या पथकाकडून शहरातील सर्वच जुन्या आणि नव्या मालमस्तानचे लेझर गन द्वारे मोजमाप करण्यात आले होते.उल्लेखनीय की,त्या लेझर गनच्या वैधतेबद्दल ग्राहक मंचकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
मात्र शहरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या आवश््यक मूलभूत नागरी सुविधा पुरविण्यास किंवा देण्यास असमर्थ आहे हे असलेल्या महापालिकेने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून मालमत्तांचे फेरमूल्यांकन करून नागरिकांवर अव्वाच्यासव्वा दरवाढ करून आपली झोळी भरून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
महापालिकेने मालमत्तांचे फेर मूल्यांकन गेली अनेक वर्षे केलेले नव्हते हे मान्य आणि ते उशिराने केले तेही मान्य .परंतु फेर मूल्यांकन करून मालमत्ताधारकांवर आहे त्यापेक्षा कितीतरी पटींनी कराचा बोजा टाकणे अयोग्यच आहे. करवाढ करतांना ती दहा,वीस टक्केपर्यंत असायला हवी होती.त्यातही नव्या आणि जुन्या मालमत्तांचे बाबतीत तसेच नवीन आणि वाढीव बांधकाम करणारांना त्या-त्या प्रमाणे आकारणी करणे क्रमप्राप्त असतांना फेरमूल्यांकन करतांना लक्ष दिले नसल्याचे दिसून येते.त्यामुळे नागरिक अर्थात मालमत्ताधारक संताप व्यक्त करू लागले आहेत.
महापालिकेने मालमत्तांचे फेरमूल्यांकन करून धारकांना नोटीस बजावल्या आणि त्यावर कोणाची हरकत असल्यास तशी तक्रार करण्याची मुभा दिली आहे.त्यावर आजपावेतो नोटीस बजावण्यात आलेल्या 40 ते 50 टक्के मालमत्ताधारकांनी विरोध दर्शविला असून त्या लोकांना सुनावणसाठी बोलविले असता त्यांची थातूरमातूर उत्तरे देऊन रवानगी करण्यात येत असल्याच्याही तक्रारी आहेत.म्हणजे कोणाचेच म्हणणे ऐकून घेतले जात नाही.महापालिकेतील अधिकारी वर्ग त्यांचेच म्हणणे दामटून आमची कार्यवाही योग्यच असल्याचे त्यांना पटवून देत लोकांची बोळवण करीत आहेत.
शहराच्या एसएमआयटी नगर परिसरातील एका निवासी संकुलातील फ्लॅटधारक पोलीस कर्मचाऱ्याने त्यासंदर्भात ‘साईमत’ कडे व्यथा मांडली. त्य ांच्या म्हणण्या नुसार संबंधित संकुलाच्या तिसऱ्या माळ्यावर त्यांचा फ्लॅट आहे.संकुलाच्या घरपट्टी आकारणीनुसार खालच्या म्हणजे तळ मजल्यावरील फ्लॅट धारकांपेक्षा वरच्या मजल्यावरील फ्लॅटची आकारणी कमी सांगण्यात येते.मात्र संबंधित फ्लॅटधारक प्रवीण पाटील हे तळ मजल्यापेक्षा जास्त घरपट्टी भरीत आहेत.गेल्या 11वर्षांपासून पाटील कराचा भरणा करत आहेत आणि त्यांनी त्याबद्दल लेखी तक्रारी करून सारा प्रकार अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देऊनही काहीच फरक पडलेला नाही आणि आता त्या फ्लॅट मध्ये कोणताच बदल व बांधकाम केलेले नसतांना त्यांना फेरमूल्यांकन करून आणखी दरवाढ लादण्यात आली आहे.
प्रवीण पाटील यांनी हरकत घेतली,त्यावर त्यांची सुनावणी झाली मात्र प्रशासनाने त्याचेच खरे सांगून त्यांची हरकत फेटाळून लावल्याचे पाटील म्हणाले.मग लोकांना तक्रार व हरकत मांडण्यास का सांगतात असा त्यांचाच नव्हे तर शहरातील साऱ्या मालमत्ताधारकांचा प्रश्न आहे.
शहरातील सर्वच मालमत्ताधारक आज या वाढीव घरपट्टीच्या नोटिसांनी परेशान असतांना नगरसेवक ललित कोल्हे सोडता कोणत्याच सत्ताधारी किंवा विरोधी किंवा बंडखोर गटातील कोणत्याच नगरसेवक ,लोकप्रतिनिधी ,आमदार आणि खासदाराने त्यावर आवाज उठविलेला
नाही.ललित कोल्हे यांनी 40 ते 50 पटींनी घरपट्टी दारात वाढ केल्याचे व ते मनमानी असल्याचा आरोप केला आहे.त्यांच्याच प्रमाणे कोणत्याही आंदोलनात आघाडीवर असलेल्या डॉ. राधेश््याम चौधरी यांनी त्याबद्दल तक्रार केली आहे.
वास्तविक शहरातील नगरसेवक ते सत्ताधारी असोत की विरोधी किंवा ते फुटीर अथवा बंडखोर का असेनात, त्यांनी लोकभावना लक्षात घेऊन घरपट्टी फेरमूल्यांकनचा कडाडून विरोध करायला हवा होता पण स्थनिक नगरसेवक,पदाधिकारी,राजकीय पक्षाचे मग ते शिवसेना,राष्ट्रवादी आणि भाजपचे का असेनात त्यांनी आजतरी चौकांच्या व सर्कलच्या नामकरण कार्यक्रमात आपल्याला झोकून दिले असल्याचे दिसत आहे म्हणजे त्या लोकांना लोकांच्या किंवा शहरवासीयांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाशी काहीही घेणे देणे नाही असेच स्पष्ट हेोत आहे.
एकीकडे लोक कोरोना महामारीने त्रस्त आहेत.त्यात लोकांची रोजीरोटीचा प्रश्न आहे.लॉकडाऊनच्या नियमाने लोक दोन वेळेच्या जेवणासाठी झटत आहेत.अनेकांची रोजी गेली,घरभाडे भरणे मुश्किल झालेले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत मंदीचे सावट
आहे.लोक नागरी समस्याग्रस्त आहेत.रस्त्यांमुळे सारे शहर त्रस्त आहे. तशातच महापालिकेने लोकांना फेर मूल्यांकनच्या नावाने आर्थिक भुर्दंड ठोकला आहे.आमदार राजूमामा भोळे हे तर जळगाव शहराचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांनीही ते कोणत्याही राजकीय पक्षाचे असोत त्यांनी वाढीव घरपट्टी विषयी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी जळगावकरांची अपेक्षा आहे.