जळगाव, प्रतिनिधी: कोरोनावरून माजी मंत्री एकनाथराव खडसे व माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांच्यात सुरू झालेले शाब्दिक युद्ध चांगलेच रंगात आले आहे. ‘गिरीशभाऊंना बुधवार पेठेत पाठवावे लागेल’ असे वक्तव्य एकनाथराव खडसेंनी केले होते त्यावर गुगली टाकत खडसेंनी नवीनच वक्तव्य केले आहे.
पुण्याच्या बुधवार पेठेत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आहे. त्या ठिकाणी महाजन यांनी दर्शन घ्यावे, असे मी सुचवले होते. परंतु, ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ याप्रमाणे त्यांच्या मनात होते तेच त्यांना दिसले”, माझा दृष्टिकोन चांगला आहे. गिरीश महाजन यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घावे त्यांना त्याचा लाभ होईल. असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला आहे.
खडसे आणि महाजन यांच्यातील शाब्दिक युद्धाची चर्चा राज्यभरात सुरू आहे. या वादात शिवसेना नेते व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही उडी घेतली आहे. ते म्हणाले की, या दोघांचे हे जुने वाद आहेत. त्यात मला पडायचे नाही. मात्र, दोघांनी वाद वाढवल्यास या वादामुळे जिल्ह्याचे भले होणार नाही, असे मला वाटते. या उलट सर्वांनी एकत्र येऊन काम केले तर जिल्ह्याचा विकास होईल.
वादाची सुरवात कुठून?
खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी, सक्तवसुली संचनालयाकडून (ED) अटक होणार असल्याच्या भीतीने खडसे यांना कोरोना झाल्याचा आरोप आमदार महाजन यांनी केला होता. नंतर महाजन यांना कोरोना संसर्ग होताच खडसे यांनी त्याचे उट्टे काढले होते. अटकेच्या भीतीने महाजन यांना कोरोना झाला, असा टोला खडसेंनी लगावला होता. त्यावर महाजन यांनी खडसे यांना ठाण्याच्या हॉस्पिटल मध्ये दाखवावे, अशी टीका केली. यानंतर खडसे यांनी गिरीशभाऊ यांना पुण्याच्या बुधवार पेठेत दाखवावे, असा टोला लगावला. त्याला पुन्हा महाजन यांनीही प्रत्युत्तर दिले होते.